नवी दिल्ली : सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत भारत किती मागे आहे, ते काही दिवसांपूर्वीच सरकारी वेबसाईटवरुन डेटा हॅक झाल्यानंतर लक्षात आलं. अशाच घटना अनेकदा समोर आल्या, ज्यामुळे भारताच्या सायबर सिक्युरिटीवर सवाल उठवण्यात आले आहेत.


युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियनच्या एका सर्वेक्षणामध्ये भारत सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत 25 व्या स्थानावर आहे. भारतात अजूनही सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत जागरुकता, समजदारी आणि ठोस धोरणाची कमी असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

या सर्व्हेमध्ये सिंगापूर पहिल्या, तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप 10 देशांमध्ये मलेशिया, ओमान, मॉरिशिअस, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया, फ्रान्स आणि कॅनडा यांचा समावेश आहे. रशिया या यादीत 11 व्या, जर्मनी 12 व्या, तर चीन थेट 34 व्या स्थानावर आहे. म्हणजेच भारतापेक्षाही चीन सायबर सिक्युरिटीबाबतीत मागासलेला आहे.

देशात सध्या कॅशलेसला चालना दिली जात आहे. मात्र यूएनच्या सर्वेक्षणातील ही सर्व आकडेवारी पाहता कॅशलेस व्यवहार भारतीयांसाठी किती महागडा ठरु शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी.