नवी दिल्ली : रिलायन्स जिओमुळे भारतातील मोठ-मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना फटका बसला आहे. टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटा आणि प्राईज वॉर सुरु झालं आहे. आयडियाची तिमाही आकडेवारी नुकतीच समोर आली आणि जिओमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांना केवढा फटका बसला आहे, हेही दिसून आलंय. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये आयडिया कंपनीला तब्बल 385 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.


जिओचा थेट फटका

विशेष म्हणजे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आयडियाला 91.5 कोटींचा नफा झाला होता. मात्र, पुढील तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये 385 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे याच तिमाहीत भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने एन्ट्री घेतली होती. त्यामुळे रिलायन्स जिओचा आयडियाला थेट फटका बसला, हे स्पष्ट आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी मोबाईल व्हॉईस कॉल रेट्समध्ये 10.6 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. शिवाय, इंटरनेट डेटाच्या किंमतींमध्ये 15 टक्क्यांची कपात करण्यात आली होती.

आयडियाच्या ग्राहकांच्या संख्येतही घट

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आयडिया सेल्युलरच्या ग्राहकांची संख्या 5.41 कोटींहून 4.6 कोटींवर घसरली.

जिओमुळे टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले!

सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर भारतातील बहुतेक टेलिकॉम कंपन्यांना जोरदार फटका बसला आहे. जिओने वेलकम ऑफरमध्ये फ्री व्हॉईस कॉल आणि डेटासारख्या सुविधा दिल्या. विशेष म्हणजे जिओने मार्चपर्यंत वेलकम ऑफरची मुदतही वाढवली. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. इतर कंपन्यांनाही आपल्या व्हॉईस कॉल आणि डेटा चार्जेसमध्ये कपात करावी लागली.