चिपको आंदोलनाची 45 वर्ष, गुगलकडून उजाळा
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2018 10:48 AM (IST)
वृक्ष वाचवण्यासाठी आंदोलक झाडांना मिठी मारत असत. त्यामुळे याला ‘चिपको आंदोलन’ हे नाव पडलं.
मुंबई : चिपको आंदोलनाला आज 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने गुगलने डूडलच्या माध्यमातून चिपको आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात 1970 च्या दशकात झाली होती. आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंसा आणि उपद्रवाशिवाय ते केलं होतं. वृक्षतोडीविरोधात अतिशय शांततेत हे आंदोलन करण्यात आलं होतं. जंगलातील वृक्षतोडीविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं होतं. वृक्ष वाचवण्यासाठी आंदोलक झाडांना मिठी मारत असत. त्यामुळे याला ‘चिपको आंदोलन’ हे नाव पडलं. 1974 मध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाच्या जनक गौरी देवी होत्या. त्यांना ‘चिपको वुमन’ नावानेही ओळखलं जातं. जोधपुरच्या महाराजांनी वृक्षतोडीचे आदेश होते. पण त्यावेळी बिश्नोई समाजाच्या महिलांनी झाडांना मिठी मारुन वृक्षतोडीला विरोध केला होता. या आंदोलनात बिश्नोई समाजाचं योगदान महत्त्वाचं होतं. अलकनंदा खोऱ्याच्या मंडल गावात एप्रिल 1973 मध्ये सुरु झालेलं हे आंदोलन हळूहळू संपूर्ण उत्तर प्रदेश आणि हिमालयातही पसरलं होतं.