मुंबई :  मोबाईलवर आलेले मिस्ड कॉल्स तुमचं बँक खातं रिकामं करु शकतात. मुंबईतल्या एका व्यापाऱ्यासोबत असंच काहीसं घडलंय. एका रात्रीत त्यांना काही मिस्डकॉल आले आणि त्यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये गायब झाले. याला सिम स्वॅप म्हणतात. सायबर गुन्हेगारीत हा प्रकार सध्या जास्त  मोठ्या प्रमाणात प्रचलित होत आहे.


मुंबईतील दादरमधल्या एका व्यापाऱ्याला 27 डिसेंबरला त्यांच्या मोबाईलवर 3 वेगवेगळ्या नंबरवरुन 6 मिस्ड कॉल्स आले आणि नंतर त्यांचं सिमकार्डच बंद झालं. या व्यापाऱ्याकडे काम करत असलेला माणूस जेव्हा बँकेत पैसे काढण्यासाठी गेला. तेव्हा खात्यातून पैसे काढले गेल्याचा प्रकार लक्षात आला. ऑनलाईन ट्रान्झक्शनवर सरकारसोबतच सर्वसामान्यांचा भर जास्त आहे. त्यातूनच सायबर गुन्ह्यांचीही संख्या वाढत चालली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते हा प्रकार सिम स्वॅप असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

खात्यातून कोट्यवधी काढले गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने सायबर सेलकडे याची तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी पुढचा तपास सुरु केला आहे.

नेमके हे मोबाईल फ्रॉड होतात तरी कसे?

- सगळी वैयक्तिक माहिती अवैधरित्या गोळा केली जाते.

- बनावट ई-मेल, बनावट फोन कॉल करून बारीक नजर ठेवली जाते.

- सोशल मीडियावरच्या माहितीच्या आधारे बँक खात्यातला सर्व तपशील जमा केला जातो.

- बनावट कागदपत्र तयार केली जातात. मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधला जातो.

- फोन खराब झाल्याचं कारण देत सिम ब्लॉक करण्याची विनंती केली जाते.

- या फसवेगिरीसाठी शुक्रवार, शनिवार निवडला जातो. जेणेकरुन खरा ग्राहक मोबाईल गॅलरीपर्यंत पोहोचू शकणार नाही

- फसवणूक करणारा नवीन सिमच्या मदतीने वनटाइम पासवर्ड स्वत:च्या मोबाइलवर मिळवतो.

- ऑनलाईन आर्थिक व्यवहार पूर्ण केले जातात. हा OTP खऱ्या ग्राहकाचा फोन बंद असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचत नाही

या स्विम स्वॅपपासून कशी काळजी घ्याल?

महत्वाचं म्हणजे नवा, आधुनिक मोबाइल घेणार असाल, तर त्याचे फीचर्स जाणून घेण्याआधी त्याच्या सुरक्षेचे उपाय आधी जाणून घ्या.

- अनोळखी नंबरवरुन आलेल्या एसएमएसवरची लिंक क्लिक करु नका

- फोनवर तुमची माहिती कुणाला देऊ नका.

- बँक फोन करुन पासवर्ड, जन्मतारीख अशी वैयक्तिक माहिती विचारत नाही.

- प्रत्यक्ष बँकेत जाऊन माहिती अपडेट करावी लागते.

- तुमचे बँक, मोबाईल डिटेल्स, एटीएम कार्ड माहिती, आधार क्रमांकाची माहिती फोनवर कोणालाही देऊ नका.

सध्याचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. अनेक व्यवहार ऑनलाईन होतात. मात्र त्या तुलनेत सायबर तपास यंत्रणा हवी तेवढी सक्षम नाही. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे.