नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना रिलायन्स जिओने मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आता बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीही ग्राहकांसाठी नवे व्हॉईस कॉल प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. बीएसएनलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका कार्यक्रमात तसे संकेत दिले आहेत.


“बीएसएनल यूझर्ससाठी अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल व्हॉईस कॉल प्लॅन बाजारात आणण्याचा विचार करत आहे. बीएसएनएलवरुन इतर कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर कॉलसाठी ही सुविधा असेल. त्याचबरोबर 149 रुपये किंवा त्याहून कमी दरात डेटाही उपलब्ध करुन देण्याचीही कल्पना आहे.”, अशी माहिती बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.

बीएसएनएलमध्ये सध्या सुधारणांचे वारे वाहत आहेत. शिवाय, बीएसएनएलची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. आता बीएसएनएलच्या कामाचा फायदाही मिळण्यास सुरुवात झाली आहे, असेही अनुपम श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.

“2018-19 या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मिळवू, अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे येत्या काळात भारतातील टॉप-3 टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये बीएसएनएल असेल”, असेही श्रीवास्तव म्हणाले.

बीएसएनएलच्या प्रगतीबद्दल सांगताना श्रीवास्तव म्हणाले, “एकेकाळी बीएसएनल क्रमांक एकची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी होती. मात्र, त्यानंतर सहाव्या स्थानावर घसरली. मात्र, आता पुन्हा एकदा बीएसएनएलने भरारी घेतली असून, चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.”

देशभरात आजच्या घडीला एकूण सेलफोन यूझर्सपैकी 10 टक्के यूझर्स बीएसएनएलचे ग्राहक आहेत. ही आकडेवारी 10 टक्क्यांहून 15 टक्के करण्यासाठी बीएसएनएलचे प्रयत्न सुरु आहेत.

रिलायन्स जिओने ज्याप्रकारे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना आपलसं केलं, त्याचप्रमाणे लँडलाईन आणि फोन अशा दोन्हीकडे बीएसएनएलचं लक्ष्य असेल. बीएसएनएलचे नवे प्लॅन नव्या वर्षात जानेवारीच्या पहिल्या दिवसापासूनच सुरु होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओने अनलिमिटेड 4G इंटरनेट डेटा देऊन टेलिकॉम क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. इतर कंपन्यांचे ग्राहक रिलायन्स जिओकडे वळले. त्यामुळे आधीच टेलिकॉम क्षेत्रात मोठं स्पर्धेचं वातावरण असताना बीएसएनएलने अनलिमिटेड व्हॉईस कॉलसाठी नवे प्लॅन आणण्याची तयारी करत आहे. त्यामुळे येत्या काळात किंबहुना पुढल्या वर्षीच टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा अत्यंत अटीतटीची होणार आहे.