मुंबई : सध्या पावसाळा सुरु आहे आहे. पावसाऱ्यात ओल्या रस्त्यावरुन पावसात गाडी चालवणे मोठ्या कसरतीचं काम असतं. मुसळधार पावसात बाईक, स्कूटर चालवणे टाळले पाहिजे, परंतु अनेकदा लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पावसाच्या दरम्यान दुचाकी चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.


नेहमी हेल्मेट घाला


हेल्मेट हे आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून जेव्हा कधी बाईल चालवाल तेव्हा हेल्मेट नक्की घाला. हेल्मेटशिवाय बाईक  चालवणे धोकादायक ठरू शकते. पावसात हेल्मेटच्या काचेमुळे पावसाचे पाणी डोळ्यांवर येत नाही, यामुळे गाडी चालवणे सोपे जाते.


टायरकडे नियमीत लक्ष द्या
 
बऱ्याचदा लोक त्यांच्या बाईकचे खराब आणि घाललेले टायर वेळेवर बदलत नाहीत, ज्यामुळे टायरमधील ग्रीप संपल्याने बाईक घसरण्याचा धोका जास्त असतो. म्हणून चांगल्या कंपनीचे आणि चांगली ग्रीप असलेले टायर वापरा.


अचानक ब्रेक मारणे टाळा


पावसाळ्यात अचानक ब्रेक लावणे टाळले पाहिजे. जरी ब्रेक लावणे आवश्यक असले तरीही पुढील आणि मागील ब्रेक लीव्हर्स एकाच वेळी दाबा. असे केल्याने बाईक घसरणार नाही. तसेच वळणावर ब्रेक लावू नये, याची काळजी घ्या.


स्पीड कमी ठेवा


पावसाळ्यात बाईकचा स्पीड कमी ठेवा. कारण पावसात रस्त्यावरील कर्षण कमी होते. तसेच मुसळधार पावसात दृश्यमानताही कमी असते. अशा परिस्थितीत तुमच्या वाहनाचा वेग फक्त 30 ते 40 किमी प्रति तास असावा.


पाण्यात जाणे टाळा


पावसाळ्यात अशा मार्गांवर जाऊ नये जिथे पाणी भरलेले असते. कारण कधीकधी मोठे खड्डे पाण्याने भरतात, ज्यामुळे अपघात होतात. एवढेच नाही तर त्या रस्त्यांवर बाईक किंवा स्कूटरच्या एक्झॉस्टमध्ये पाणी गेल्याने गाडी बंद पडू शकते.


फिंगर वायपर फायदेशीर


फिंगर वाइपरबद्दल तुम्ही ऐकलं असेल. चारचाकी वाहनांमध्ये विंडस्क्रीनवर बसवलेल्या वायपर्स प्रमाणे ते काम करतात. फिंगर वाइपर्सच्या मदतीने हेल्मेट ग्लास पावसाच्या वेळी स्वच्छ करता येते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बाईक थांबवण्याची गरजही पडत नाही.