मुंबई: एलईडी बल्बचा वापर वाढावा यासाठी मोदी सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता 65 रुपयांना 9 वॅटचा एलईडी बल्ब मिळणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं लोकांनी एलईडी बल्ब वापरावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.


उर्जेची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी एलईडीच्या बल्बच्या वापरावर अधिक भर देण्याचं आवाहन याआधीही लोकांना केलं होतं. मात्र एलईडी बल्बची किंमत थोडी अधिक असल्यानं अनेकांच्या हे आवाक्याबाहेर होतं. त्यामुळं आता सरकारनं अवघ्या 65 रुपयात 9 व्हॅटचा एलईडी बल्ब देण्याची योजना आणली आहे.

दरम्यान, एलईडी बल्ब प्रमाणे, एलईडी ट्यूबलाईट आणि पंखा देखील मोदी सरकारानं बाजारात आणलं आहे. एलईडी ट्युबलाईट तब्बल 64% तर पंखा 50% वीजबचत करेल असा सरकारनं दावा केला आहे. सरकारनं बाजारात आणलेल्या या एलईडी ट्युबलाईटची किंमत 230 रु. आहे. तर पंख्याची किंमत 1150 रु. आहे.