अंकुश कानडे हे नेवासा तालुक्यातील आंतरवाली इथले रहिवासी. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून 20 वर्षापूर्वी देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरु केला. अवघ्या 22 कोंबड्यांपासून सुरु केलेल्या या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं आहे.
अंकुश कानडे यांचा हा व्यवसाय आता देशी कोंबड्यांची पैदास करणारा राज्यातील मोठा व्यवसाय ठरला आहे. कानडे यांनी आर्थिक नियोजन करत ब्रिडींग फार्म, अंडी आणि चिकन अशा विविध अंगाने व्यवसायाचा विस्तार केला. आज त्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटींपर्यंत पोहोचली आहे.
अंकुश कानडे जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करत होते. मात्र त्यांना उद्योग-व्यवसाय खुणावत होता. त्यांनी 1997 मध्ये ब्रॉयर कोंबडीपासून कुक्कुटपालनाला सुरुवात केली. पण आर्थिक गणित न जुळल्याने तो व्यवसाय थांबवला. त्यानंतर आंतरवालीपासून जवळ कुकाणा येथील बाजारातून सुमारे दोन हजार देशी कोंबड्यांचे पालन सुरु केले.
चार महिन्यांचे संगोपन करण्यासाठी प्रति कोंबडीला 35 रुपये खर्च आला. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर व्यवसाय वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महाराष्ट्रातील देशी कोंबडी आणि दक्षिणेतील देळशी कोंबडी यांचं ब्रीड तयार करुन त्यांनी नव्या संशोधनाची कास धरली. देशी कोंबडीची अस्सल चव असलेल्या चैतन्य गावरान क्रास हा ब्रँड त्यांनी उदयास आणला. आज संपूर्ण राज्यभर त्याची मागणी होत आहे.
कसा उभारला उद्योग?
कानडे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी सुरुवातीला दोन लाख रुपये खर्च करुन तीन हजार चौरस फुटांचे शेड उभे केले. त्यांनी अंडी उबवणारी यंत्रणा सुरु करण्याचं ठरवलं. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च करुन या यंत्राची दिल्लीहून खरेदी केली. त्यानंतर जिल्हाभरातील बाजारातून देशी अंडी खरेदी केली. तीन हजार पिल्लांचे संगोपन सुरु केले.
प्रत्येक पक्षाला 50 रुपये याप्रमाणे दीड लाख रुपये खर्च झाला. मुंबईत कोंबड्यांची विक्री केली. प्रति पक्षाला 81 रुपये मिळाले. त्यातून एक लाख रुपयाचा नफा मिळाला. वर्षभरात तीन वेळा प्रत्येकी तीन हजार कोंबड्यांचे पालन केले. त्यातून जवळपास तीन लाख रुपये नफा मिळाला.
मिळालेल्या नफ्यातून नियोजनबद्ध गुंतवणूक केली. मुलगा संतोष यांनीही व्यवसायाची जबाबदारी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली उचलली आहे. बीएससी अॅग्री आणि एमबीए मार्केटिंग केलेल्या संतोष कानडे यांनी या व्यवसायाला व्यवसायिक स्वरुप दिलं.
व्यवसायाची भरभराट
आंतरवाली येथे अंडी उबवणी आणि देशी कोंबडी पालनातून दोन वर्षात बऱ्यापैकी भरभराट झाली. स्वतःच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या पिल्लांसह इतरांसाठीही अंडी उबवून पिले तयार करुन देण्याचे काम सुरु केले. महिन्याला साधारण 12 हजार पिल्लांचे उत्पादन आणि महिन्याला 50 हजार रुपये उत्पन्न मिळू लागले. देशी पक्षांना मागणी वाढली. प्रती पिलासाठी 4 रुपये खर्च येत असताना 8 रुपये मिळू लागले. देशी पिलांना मागणी वाढू लागली.
परदेशी कंपनीसोबत कामाला सुरुवात
2006 मध्ये थायलंडच्या एका परदेशी कंपनीमुळे व्यवसायाला बळकटी मिळाली. त्या कंपनीला दर महिन्याला साधारण चार लाख अंडी उबवून हवी होती. तशी क्षमता असलेले यंत्र खरेदी करण्यासाठी कंपनीने 10 लाखांची आगाऊ रक्कम दिली. मग कानडे यांनी अंडी उबवणीचे 16 लाख रुपयांचे तिसरे युनिट खरेदी केले. चार वर्षे संबंधित कंपनीसोबत काम केल्याने व्यवसायाला चांगली बळकटी मिळाली.
देशी पिल्लांच्या उत्पादनाचा सर्वात मोठा उद्योग
देशी कोंबडीला मोठी मागणी आहे. मिळणारा दर आणि त्यासाठी लागणारा खर्च यांचा विचार केला तर या पक्षांतून पैसे अधिक मिळतात असे कानडे सांगतात. देशी पिल्लांची पैदास करणारा त्यांचा राज्यातील मोठा उद्योग आहे. दक्षिणेकडील व महाराष्ट्रातील कोंबडीचा संकर करून चैतन्य हा कोंबडीचा वाण त्यांनी विकसित केला आहे. ही कोंबडी कधीच तोट्यात विकावी लागली नाही हा वीस वर्षांतील अनुभव असल्याचे कानडे सांगतात.
कानडे यांचा पोल्ट्री व्यवसाय
नऊ ब्रिडींग फार्मस - त्यात साडेतीन ते चार लाख अंडी उत्पादन - प्रति महिना
कोंबडी पालन : 6 हजार
व्यावसायिक पोल्ट्रीचे सात शेडस
पक्षांची संख्या सुमारे 40 हजार
दररोज अंडी उत्पादन सुमारे 20 हजार
वार्षिक उलाढाल - सुमारे पाच कोटी रु.
अंडी आणि चिकन असा व्यवसायाचा दुहेरी हेतू
शेतीपूरक व्यवसाय गरजेचा
आज पारंपरिक शेतीचे दिवस राहिले नसून नवनवीन तंत्रज्ञान शेतीत आले आहेत. त्याचा उपयोग करतानाच आपली आर्थिक पत शेतकऱ्याने वाढवणे गरजेचे आहे. शेतकऱ्याने शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करणे आज काळाची गरज आहे, असं अंकुश कानडे यांनी सांगितलं.
VIDEO: