Supriya Sule On Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाल्या आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे. सरकारकडून (Maharashtra Government) जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, जरांगे मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Copngress Party) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हेच मनोज जरांगे 109 दिवस आंदोलनाला बसले होते, त्यावेळ पालकमंत्री राजेश टोपे होते, त्यावेळी राजेश टोपे यांनी प्रेमानं, शांततेनं बोलून मार्ग काढला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच, आताच्या सरकारनंही यातून मार्ग काढावा, सरकार कशासाठी आहे, मायबाप जनतेसाठी आहे. गाड्या, हेलिकॉप्टर आणि प्रायव्हेट प्लेनमधून फिरण्यासाठी नाही, असं देखील सुप्रीया सुळे म्हणाल्या होत्या. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रीया सुळे बोलताना म्हणाल्या की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात हेच मनोज जरांगे 109 दिवस आंदोलनाला बसले होते. तेव्हा त्यावेळचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शांततेने प्रेमाने बोलून कसा मार्ग काढला, आता या सरकारनं देखील मार्ग काढावा."जरांगे यांच्या आंदोलनात लाठीचार्ज होतो कसा? असा सवाल उपस्थित करत आम्ही प्रेमानं आणि गोड बोलून आंदोलन सोडवलं आणि यांनी जालियनवाला बाग केला, आंदोलकांची, महिलांची डोकी फोडलीत, असाही टोलाही सुप्रिया सुळेंनी यावेळी लगावला.


सोमवारी सुप्रिया सुळे पंढरपूर आणि मंगळवेढा दौऱ्यावर असताना त्यांनी अभिजित पाटील यांच्या घरी भेट दिली असता, त्या बोलत होत्या. आज पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी अभिजित पाटील, जयमाला गायकवाड, सुभाष भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 


सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मार्ग निघत नसल्यानं हतबल झाले असताना आज सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली. सरकार म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरायचं नसतं, तर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. आघाडीच्या काळात देखील आम्ही आंदोलकांना प्रस्ताव दिले होते. आता हे सत्तेत आहेत ना मग त्यांनी काढावा मार्ग अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडवली. आम्हाला कधीही चर्चेला बोलवावं आम्ही यासाठी तयार आहोत, असाही टोला लगावला. 


दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या आरोपांवर मात्र सुप्रिया सुळे यांनी बगल देत शिवसेना फुटल्यावर राष्ट्रवादी सत्तेत जाणार होती आणि त्यासाठी सह्यांचे पत्र तयार होते. याबाबत आपणास काहीही माहित नसून मी आमदार नाही, असा टोला लगावला. राज्य सरकार लोकांना सरकारी सेवेत कायम करायच्या मानसिकतेमध्ये नसल्यानं सध्या नवीन भरती कंत्राटी पद्धतीवर करायचं धोरण सुरु केलं आहे. यामुळे सरकारी नोकरी म्हणजे, सुरक्षिततेची भावना होती तीच संपवायचं काम हे सरकार करत असल्याचा घणाघात केला. गरज असेल तेव्हा घ्यायचं आणि गरज संपली की काढून टाकायचं, असा उद्योग हे सरकार करत आहे. या सरकारचं धोरण सर्वच ठिकाणी अपयशी होत असून राज्यातील दुष्काळ, मराठा, धनगर आरक्षण, एसटी, आरोग्य, शिक्षण या सर्वच प्रश्नात या सरकारला अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या केंद्रातील सरकार तर ICE वर आपलं सरकार चालवत असल्याचा टोलाही मोदी सरकारला लगावला. लोकसभेचं खास अधिवेशन बोलावलं पण त्याचा अजेंडाच नाही, शून्य प्रहर नाही, प्रश्नोत्तर नाही मग अधिवेशन कशाचं? असा सवाल केला. म्हणूनच आम्ही त्यांना आता आमचा अजेंडा पाठवल्याचं यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.