सोलापूर : आरक्षणाचा विषय, जातनिहाय जनगणना या विषयांवर पक्षापेक्षा माझे वेगळे मत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचे हे मला मान्य नाही. ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे त्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे, श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं मतही (Sushilkumar Shinde Exclusive On Maratha Reservation) त्यांनी व्यक्त केलं. सुशिलकुमार शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना वरील मत व्यक्त केलं. 


सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सन 1980 पर्यंत जात हा मुद्दा राज्यात महत्त्वाचं नव्हता, 1985 नंतर मात्र परिस्थिती बदलली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि जातीय व्यवस्थेवर चालायचं हे मला अजिबात मान्य नाही. जातीचा आणि आर्थिक विषयाचा काहीही संबंध नाही. पण राज्यात सुरू असलेली परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागते, पुढे काय होईल सांगता येतं नाही. 


आरक्षण देण्याचं सरकारने कबुल केलं असेल तर ते त्यांनी द्यायला हव, कायद्याच्या चौकटीत ते कसं बसवयचं हे सरकारने ठरवावं. माझं मतं आहे की कोणाचं आरक्षण काढून देऊ नये, स्वतंत्र कायदा केला पाहिजे. माझं मतं आहे की जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंतच आरक्षण वापरलं पाहिजे, नंतर सोडलं पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये. 


माझ्याबाबतीत जात हा मुद्दा महत्त्वाचा नाही


माझ्याबाबतीत जात हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असे मला वाटतं नाही, कारण मी अनेकदा मी जनरल सीटवर निवडून आलोय. मी सर्वधर्म समभाव मानणारा माणूस आहे. मला मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालं नाही, त्याला जात हे कारण असावं असं मला वाटतं नाही. पण सोनिया गांधी यांचा फोन होता, त्यानी सांगितलं मी तुम्हाला राज्यपाल करणार आहे, ते मी स्वीकारलं. मला याबाबतीत कुठलीही खंत वाटली नाही, उलट मला एकदा राज्यपाल व्हायचं होतं, ते सोनिया गांधींनी पूर्ण केलं. पण मी राज्यपाल होण्याचं स्वीकारलं म्हणून पुढच्या काळात मला ऊर्जा मंत्री, गृहमंत्री केलं गेलं. 


प्रणिती शिंदे लोकसभा लढतील (Praniti Shinde Solapur Loksabha Election) 


लोकसभेच्या निवडणुकीवर बोलताना शिंदे म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे मी जाहीर केलं आहे. मी प्रणिती शिंदे यांचं नाव सुचवलेलं आहे, पण निर्णय हायकमांड घेईल. सावरकर यांचं हिंदुत्व बाबतीतची भूमिका मला मान्य नाही, पतितपावन मंदिराबाबतीत त्यांची भूमिका मला मान्य आहे म्हणून मला ते आवडतात. पण सर्व भूमिका मान्य नाहीत. 


सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मी गांधी घरण्याशी लॉयल आहे, माझ्या सारख्या माणसाला इथंपर्यंत पुढे शक्य होतं का? दलितांना पुढे आणण्याचा त्यांचा विचार आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, अन्यथा मी कधीच मुख्यमंत्री झालो नसतो. मी बीएसएफ ट्रेनिंग सेंटर, बोरमणी विमानतळ, हन्नूर येथे SSB ट्रेनिंग सेंटरसाठी प्रोजेक्ट आणले. पण त्याला पुढे कोणीही नेलं नाही. त्यामुळे हे प्रोजेक्ट अद्याप ही रखडलेलं आहेत. केवळ एक माळढोक पक्षीमुळे बोरामणी विमानतळ रखडलेलं आहे. 


शरद पवारांवर टीका का करत नाही? सोनिया गांधींचा प्रश्न 


इंदिरा गांधी म्हणाल्या की, शिंदे आप शरद पवार पर कभी बात नही करते,.तेव्हा मी सांगितलं की मी पोलीस असताना त्यांनी मला राजकारणात आणलं. तिकीट देण्यापासून निवडणुकीच खर्च देईपर्यंत शरद पवार यांनीच केलं. पण तुम्ही सांगितलं तर मी टीका करतो, तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या की लोक असं म्हणतात, पण तुम्ही अशी टीका करण्याची गरज नाही. 


ही बातमी वाचा: 



VIDEO : Rahul Kulkarni मधली ओळ 406 : आवश्यकता आहे तोपर्यंतच आरक्षण घ्या... सुशिल कुमार शिंदेंची रोखठोक मतं