सांगोला: सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे प्रचारासाठी येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करतो. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षासाठी मते मागतील आणि आम्ही आमच्या पक्षासाठी मते मागू .. जिथे आम्ही एकत्रित लढतो आहोत तिथे आम्ही दोघेही युतीसाठी मते मागू अशा शब्दात आज सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी सांगितले. उद्या सोलापूर जिल्ह्यात सांगोला नगरपालिकेमध्ये होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) आणि भाजप यांच्यात टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता बापूंनी शिवसेनेच्या प्रचारासाठी थेट एकनाथ शिंदे यांच्या सभेचे नियोजन केले आहे. याबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.आज पंढरपूर येथे संत नामदेव पायरीला नगरपालिका प्रचाराचा नारळ फोडताना पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पुन्हा एकदा शहाजी बापूंवर (Shahajibapu Patil) ठपका ठेवत आपण पालकमंत्री झाल्यापासून एकदाही शहाजी बापूंनी युती संदर्भात चर्चा केली अथवा प्रस्ताव ठेवला नसल्याचे गोरे यांनी सांगितले. यावेळी या संदर्भात एकदा भेटलो असता यावर चर्चा झाली आणि तेव्हा त्यांनी आपण सांगोल्यात मैत्रीपूर्ण लढती करू अशी भावना व्यक्त केली होती असा गौप्यस्फोटही पालकमंत्री गोरे यांनी केला. काही असले तरी शहाजी बापू आमचे सहकारी आणि चांगले मित्र आहेत, सध्या स्थानिक परिस्थितीमुळे बापू व्यथित झाले असले तरी निवडणुकीनंतर पुन्हा आम्ही एकत्रच असू असेही गोरे यांनी सांगितले.
Jayakumar Gore: ...म्हणून आमच्या आमच्यात लढायची वेळ आली
सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीत शरद पवारांचा पक्ष दिसत नाही मशाल दिसत नाही, पंजा तर गायबच झालाय, अशा वेळेला आम्हाला आमच्या आमच्यातच लढायची वेळ आली आहे. विरोधकच नसतील तर किमान आमच्या आमच्यात लढून घेऊ अशा शब्दात आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधी पक्षांची खिल्ली उडवली. सध्या राज्यात महायुतीत एकमेकांचे नेते फोडण्यावरून टोकाचे वाद सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. अशावेळी अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप, भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा युतीतील मित्र पक्षातच लढती होतानाचे चित्र समोर येत आहे. यावरूनच आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांची जोरदार खिल्ली उडवली. राज्यात अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असून राज्यातील मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने भाजपसोबत येताना आणि कमळाच्या चिन्हावर उमेदवारी मागताना दिसत असल्याचेही गोरे यांनी सांगितले.