सोलापूर : सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत (Sangola Election) शेकाप आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून लढणं भाजपच्या अंगलट आल्याचं दिसून आलं. आघाडी केल्यामुळे भाजपच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारांना कमळ चिन्हाऐवजी अपक्षांच्या वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या पत्नीला तर पांगुळगाडा हे चिन्ह मिळालं आहे. त्याचवेळी, शिवसेनेच्या शहाजीबापू पाटलांचे (Shahajibapu Patil) सर्व उमेदवार मात्र धनुष्यबाण चिन्हावर उभे असतील.
नगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या चिन्ह वाटपामध्ये भाजपच्या उमेदवारांना कमळाऐवजी अपक्षाचे चिन्ह घेऊन लढायची वेळ आली आहे. सांगोल्यात नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले मारुती आबा बनकर हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
Sangola Election : प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे चिन्ह
नगरसेवकपदासाठी भाजपकडून शेकापसह इतर पक्षांसोबत आघाडी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांना अपक्षांची चिन्हे घ्यावी लागली आहेत. याचा फटका थेट भाजपचे सोलापूर जिल्हा नगराध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या पत्नीलाही बसला आहे. नगरसेवक पदासाठी त्यांना कमळ चिन्हाऐवजी पांगुळगाडा हे चिन्ह घेऊन लढायची वेळ आली आहे.
Shahajibapu Patil Vs BJP : शिवसेनेचे सर्व उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर
सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष, भाजप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांची आघाडी आहे. नगराध्यक्षपद जरी चिन्हावर असले तरी इतर ठिकाणी मात्र ऐनवेळी आघाडी झाल्याने प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे चिन्ह मिळाले आहे. याची डोकेदुखी भाजप-शेकाप आघाडीला होणार आहे. मात्र त्यांच्या विरोधात लढत असलेल्या शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांचे उमेदवार मात्र पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
भाजप जिल्हाध्यक्षावरच आपल्या पत्नीला इतर चिन्हावर निवडणूक लढविण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे आता भाजपला त्याच्या आघाडीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये वेगवेगळ्या चिन्हाचा प्रचार करावा लागणार आहे.
Shahajibapu Patil On BJP : शहाजीबापू पाटलांचे भाजपवर आरोप
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत.
लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.
ही बातमी वाचा: