Ranjeetsingh Naik Nimbalkar : राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain)दडी मारल्यानं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं पाण्याअभावी वाया जात आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत असून, चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला (Sangola) तालुक्यात दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळं मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी सांगोल्यात तातडीची बैठक घेतली. निंबाळकर हे अधिवेशनासाठी दिल्लीत गेले होते. पण ते तातडीनं दिल्लीतून पुण्यात आले आणि तिथून ते हेलिकॉप्टरने सांगोल्यात आले. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 


सांगोला आणि पंढरपूरसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे नियोजन करा


सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीसंदर्भात आग्रह धरला होता. त्यानंतक दिल्लीत असलेले खासदार निंबाळकर दुपारी विमानाने पुण्यात आले. तेथून हेलिकॉप्टरने सांगोल्यात पोहोचले. यावेळी बैठकीत निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. सांगोला आणि पंढरपूरसाठी एनआरबीसी कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे नियोजन 72 तासात करुन त्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नियमाने पाणी देण्याच्या सूचनेसोबतच टेंभू म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबतही अशाच पद्धतीने खासदार निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. 


सांगोला तालुक्यातील 81 गावांना पाण्याची टंचाई 


ग्रामीण भागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने मागेल त्या गावांना पाणी टँकर सुरु करण्याच्या सूचना यावेळी खासदार निंबाळकर यांनी दिल्या. सध्या केवळ 59 दिवस पुरेल इतकाच चारा असल्यानं चाऱ्याचं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सांगोला भागात चारा छावण्या सुरु करण्याची वेळ येणार असल्याचे निंबाळकर म्हणाले. आता पालकमंत्र्यांशी बोलून आधी टंचाई जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. सध्या सांगोला तालुक्यातील 81 गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळं 17 सप्टेंबर रोजी दिड टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडण्यात येणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यामुळं या सांगोला आणि पंढरपूर या दोन्ही शहरातील पाणी कपात 20 सप्टेंबरपासून दूर होईल असे त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर खासदार निंबाळकर पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. 


 नदी-नाले कोरडे 


सांगोला तालुक्यातील सर्व नदी, नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. टेंभू आणि म्हैसाळच्या पाण्याचे नियोजन नीट होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याचबरोबर एनआरबीसीच्या कालव्यातूनही अधिकारी पूर्ण क्षमतेने पाणी सोडत नसल्यानं शेतकरी हतबल बनले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच जिल्हा नियोजनाची बैठक घेतली होती. तरीही परिस्थिती बदलत नसल्यानं खासदार रणजित निंबाळकर यांनी तातडीची बैठक घेतली.


महत्त्वाच्या बातम्या:


Dhule News : शेतकरी बंधुनो! परिस्थितीशी दोन हात करा... धुळ्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको, शेतकरी हवालदिल