सोलापूर: आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari 2024) येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकांतून असलेली मागणी पाहून या वर्षी मंदिर समितीने 11 लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे . यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनविण्याची तयारी केल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. 


गेल्या  काही वर्षांपासून विठुरायाच्या प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जात असतो. तसे पाहता विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळीपेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी असते. आपल्या लाडक्या विठुरायाच्या सर्वोच्च उत्सव असलेल्या या यात्रेत हे लाडू प्रसाद म्हणून सोबत गावाकडे घेऊन जायची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून येथे रूढ झाली आहे . मात्र या यात्रा काळात 15 ते 20 लाख भाविक येत असल्याने या लाडू प्रसादाच्या विक्रीला मर्यादा होत्या.  


गेल्या वर्षांपासून 7 कोटी रुपयांची विक्री


सध्या मंदिर समितीने स्वतः लाडू बनविण्यास सुरुवात केली असून गेल्या वर्षीपासून जवळपास 7 कोटी रुपयांची विक्री समितीने केली आहे. भाविकांना देण्यात येणारा हा लाडू प्रसाद दर्जेदार असल्याने याला मोठी मागणी असते. यंदा पाऊस लवकर सुरु झाल्याने लाडू वाळण्यात अडचणी येऊ शकतात. याचाच विचार करून मंदिर प्रशासनाने आधीपासून लाडू बनवून त्याचे पॅकिंग करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. 


सध्या रोज 25 हजार लाडू बनविले जात असून आता रोज ही संख्या वाढत जाऊन पुढील आठवड्यात रोज दीड लाख लाडू  बनविण्याचे उद्दिष्ट ठेऊन कामाला सुरुवात केली जाणार आहे. हे लाडू बनविण्यासाठी चांगल्या दर्जाची चणा डाळ, साखर, शेंगदाणा तेल, काजू, बदाम आणि वेलदोडे याचा वापर करण्यात येत आहे . साधारण 100 किलो चणा डाळ, 150 किलो साखर, 15 किलो तेल, 2 किलो काजू, 2 किलो बदाम आणि वेलदोडे घालून 1 क्विंटल मध्ये 5200 लाडू बनविले जातात. हे लाडू बनवायला मंदिराला साधारण 35 हजार रुपये खर्च येतो आणि भाविकांना लाडू विक्रीतून मंदिराला साधारण 52 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असते . 
       
आषाढी एकादशीला हा बुंदीचा लाडू प्रसाद खाता येत नाही यासाठी 5 लाख राजगिऱ्याचे लाडू बनविण्याचेही काम सुरू असून एकादशी दिवशी हा प्रसाद भाविकांना खाता येईल. बुंदीचा प्रसाद गावाकडे नेता येईल अशी व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. सध्या आषाढीसाठी लाडू बनविण्याचे काम सुरु असताना रोजच्या होणाऱ्या विक्रीसाठीही वेगळे लाडू बनवावे लागत आहेत. त्यामुळे मंदिर समितीने आता लाडू बनविण्याचा वेग वाढविण्यासाठी जादा कामगार लावण्यास सुरुवात केली आहे. 


भाविकांना दिला जाणारा हा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत. बनवलेले लाडू वळण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची मदत घेण्यात आली असून भाविकांना हा प्रसाद कमी पडणार नाही याची काळजी मंदिर समिती घेत आहे. सध्या रोज हजारोंच्या संख्येनी लाडू बनविणे सुरू असून जास्तीत जास्त भाविकांना हा प्रसाद मिळावा यासाठी विविध ठिकाणी हे लाडू विक्रीसाठी मंदिर समितीने स्टॉल  उभारले आहेत.


ही बातमी वाचा: