सोलापूर : कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. याच्या लोकार्पणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. 


रे नगर येथे उभारलेली ही वसाहत एकूण 350 एकर परिसरात असेल. यामध्ये एकूण 834 इमारती आणि 30 हजार फ्लॅट्स असतील. सोलापुरात उभारली जातेय देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत. सोलापुरातल्या कुंभारी गावात साकार होत असलेल्या या वसाहतीच्या पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण लवकरच पार पडणार आहे. 9 जानेवारी 2019 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले. सलग 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा भव्य प्रकल्प साकारला आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःचं हक्काच घर असावं, याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. इथे केवळ डोक्यावर छत नाही तर सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 


कशी असणार आहे रे नगर वसाहत?
 
एकूण 350 एकर परिसर


एकूण 834 इमारत 


प्रत्येक इमारतीत 36 फ्लॅट्स


एकूण 30 हजार कुटुंबासाठी घर


एकूण 60 मेगावॅट विजेचे प्रकल्प काम सुरु, 20 मेगावॅटचे काम पूर्ण 


परिसरात 7 मोठ्या पाणी टाकी, ज्याची क्षमता 29 mld आहे


यामुळे 24 तास पाणी पुरवठा शक्य


परिसरात मलशुद्धीकरण केंद्र


स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा


विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडी सोय


खेळण्यासाठी क्रीडा मैदान


आरोग्यासाठी हॉस्पिटल


लोकांच्या रोजगारासाठी व्यवसाय देखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु 


अशा पद्धतीने व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न रे नगर मध्ये सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी हे ड्रीम प्रोजेक्ट असल्याने सर्वच यंत्रणा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. येत्या काही दिवसात आपल्या घराच्या चाव्या मिळणार असल्याने कामगारांना देखील मोठा आनंद आहे. मागील दहा वर्ष केलेल्या नरसय्या आडम यांच्या प्रयत्नांना राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीमुळे मूर्त स्वरूप येताना दिसतं आहे. या प्रयत्नामुळे देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरात उभी राहत आहे.