सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या जिल्ह्यात पाण्यात बुडून (Drowned) दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे उन्हाळ्यापासून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी तरुणाई पोहण्याचा आनंद घेत, विहिर, तलाव आणि जलाशयाकडे धाव घेतात. मात्र, काहीवेळा पोहण्याचा हा आनंद जीवावर बेतल्याचेही दु:खद प्रसंग घडले आहेत. आता, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या वैभववाडीतील करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली असून सुदैवाने दोघेजण बचावल्याची माहिती आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. बुधवार आज सायंकाळी ही घटना घडली. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले असून मोठ्या संख्येने ग्रामस्थही एकटवले आहेत. येथील धरणावर अंघोळीसाठी म्हणून एकूण पाच जण गेले होते. त्यातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच करुळ येथील धरणावर नागरिकांनी मोठी गर्दी केली.
वेंगुर्लेतील खोल समुद्रात पर्यटकांना नेऊ नये
तळकोकणातील सर्वात प्रसिद्ध झालेल्या वेंगुर्लेमधील निवती लाईट हाऊस येथील खोल समुद्रात पर्यटकांना घेवून जाऊ नये असे आदेश बंदर विभागाने दिले आहेत. सध्या सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने पर्यटक निवती लाईट हाऊस या ठिकाणी खोल समुद्रात पर्यटनासाठी जातात. मात्र, मान्सूनपुर्व कालावधी जवळ आला असल्या कारणाने समुद्रात कोणत्याही क्षणी वादळ सदृश्य स्थिती निर्माण होवू शकते. तसे झाल्यास खोल समुद्रात गेलेल्या प्रवासी बोटीला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जिवित व वित्त हानी होवू शकते यासाठी चालू पर्यटन हंगाम संपेपर्यंत कोणीही निवती लाईट हाऊस जवळ किंवा खोल समुद्रात पर्यटकांना घेवून बोट सफर करू नये. अन्यथा संबंधितांविरोधात विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेश बंदर विभागाने काढले आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
