सिंधुदुर्ग : हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबईत झालेल्या विजयी रॅलीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख अण्णाजी पंत असा केला. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी त्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्याच्या प्रमुखाला अण्णाजी पंत म्हणणे हा मुख्यमंत्रिपदाचा अपमान असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.
राज्याच्या प्रमुखाला अण्णाजी पंत म्हणणं हे त्या पदाचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांची तुलना ही पेशव्यांशीही करता आली असती. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत. पण ते व्यक्तिगत पातळीवर येऊ नयेत असं दीपक केसरकर म्हणाले.
यूज अँड थ्रो ही ठाकरेंची नीती
दीपक केसरकर म्हणाले की, "दोन भाऊ एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. अन्याय झाला म्हणून राज ठाकरे बाहेर पडले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर राज ठाकरे यांच्यावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा. वापरा आणि फेकून द्या ही उद्धव ठाकरेंची नीती मी स्वतः अनुभवली आहे. राणेंच्या विरोधात माझा वापर करून घेतला. यूज अँड थ्रो अशी त्यांची नीती आहे."
उद्धव ठाकरे यांना गेल्या दोन निवडणुकांत मिळालेली मतं ही फतव्याची मतं आहेत. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार कायम ठेवला.राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊन तो विचार कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे असं दीपक केसरकर म्हणाले.
राज ठाकरेंची भूमिका लवकरच समजेल
दीपक केसरकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे त्या विचारापासून दूर गेल्याने त्यांना सगळे आमदार सोडून गेले. बाळासाहेबांची भूमिका ही काँगेस सोबत जाणार नाही अशी होती. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद दिला. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका काय हे लवकरच समजेल."
मूळ पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना आता राज ठाकरेंची गरज पडली असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. तर रस्त्यावरील सत्ता कुणाकडे आहे याचं उत्तर देणार नाही. कायद्याचं पालन सर्वांना करावं लागत. राज्यात भाडंण, मारामाऱ्या होऊ नये एवढीच अपेक्षा आहे असं ते म्हणाले.
ही बातमी वाचा: