Chipi Airport : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला खराब हवामानाचा फटका बसत आहे. गेल्या 15 दिवसात 8 वेळा विमानसेवा बंद ठेवण्यात आली. कोकणात पावसाळ्यात विमान लँडिंग करण्यास पायलटला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं गेले चार दिवस विमान सेवा रद्द करण्यात आली आहे.   त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


गेल्या पंधरा दिवसांत तब्बल आठ वेळा खराब हवामानामुळं विमान सेवा रद्द करण्यात आली होती. आता तर सलग चार दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ  एअर कंपनीवर आली आहे. सिंधुदुर्ग विमानसेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र विमानसेवा सुरु झाल्यापासून खराब वातावरणाचा फटका विमान सेवा देणाऱ्या कंपनीला तसेच प्रवाशांना वारंवार बसत आहे. 


चिपी विमानतळाबद्दल


274 हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीची आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅंडिगचीही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.


10 हजार चौरस मीटरचे टर्मिनल काम असून सुमारे 180 प्रवासी क्षमतेची विमानं या ठिकाणी उतरु शकतात. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हवाईमार्गे येणारे पर्यटक हे गोवा राज्याकडे जात होते. पण चिपीचं विमानतळ सुरु झाल्यामुळं दिल्लीसारख्या महानगरातून जिल्ह्यात पर्यटकांना येणं सोपं झालं आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी देखील फायदा होणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि मासळीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड हापूस आंब्यानं मोठं नाव कमावलं आहे.