Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra : शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा (Shiv Samvad Yatra) दुसरा टप्पा आजपासून (1 ऑगस्ट) सुरु होत आहे. सिंधुदुर्गातल्या कुडाळ, वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान 1 आणि 2 ऑगस्ट रोजी ही 'शिव संवाद' यात्रा निघणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे 1 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जाणार आहेत. 


'शिव संवाद' यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक


दिवस पहिला, सोमवार 1 ऑगस्ट
- सकाळी 11.30 वाजता कुडाळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 12.30 वाजता सावंतवाडी येथे मेळावा
- सायंकाळी 6.30 वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा


दिवस दुसरा, मंगळवार 2 ऑगस्ट
- सकाळी 10 वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार
- दुपारी 12 वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 3.15 वाजता पाटण येथे शिव संवाद
- सायंकाळी 6.45 कात्रज येथे शिव संवाद


कोकणात पॉलिटिकल मंडे, आदित्य सिंधुदुर्गात तर भाजप नेत्यांचा रत्नागिरी दौरा
कोकणातला आजचा दिवस हा पॉलिटिकल मंडेच म्हणावा लागेल. कारण बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आदित्य यांच्या दौऱ्यावेळी सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन शिवसैनिकांकडून केले जाणार आहे. यावेळी आपल्या जाहीर भाषणात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात? दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आतापर्यंतच्या टीकेला काय उत्तर देतात? हे पाहावं लागणार आहे. 


निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप नेत्यांच्या दौऱ्यांना महत्त्व
तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निलेश राणे नितेश राणे  आणि प्रमोद जठार यांचा दौरा असून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलेल हा विश्वास काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. शिवाय, लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपने लक्ष केंद्रित केलेल्या 16 लोकसभा मतदारसंघांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यात रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपची ताकद देखील नगण्य आहे. त्यामुळे आजच्या दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता महत्त्व आहे. सकाळी 11 वाजता चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत.