Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed सिंधुदुर्ग: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा पुतळा काही दिवसांपूर्वी पडला होता. या पुतळ्यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीकेची प्रचंड झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed) सिंधुदुर्गात कोसळणं हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेला डाग आहे. तो डाग पुसून काढण्यासाठी राजकोट किल्ल्यावर भारतातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडून पुतळा तयार करून घेतला जाणार, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. 


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि पराक्रम यापुढे पिढ्यान-पिढ्या समजला पाहिजे. यासाठी राजकोट किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलेला प्रस्ताव संमत झाला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे हा प्रस्ताव गेल्यावर याला अंतिम मंजूरी मिळून 100 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितले. 


अवघ्या आठ महिन्यांत पुतळा पडल्याने दर्जाबाबत शंका-


गेल्यावर्षी नौदल दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला होता. जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नसतानाही भारतीय नौदलाकडून त्याला हे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे याला हा पुतळा उभारण्यासाठी 26 लाख रुपये मिळाले होते, असा दावा विरोधकांनी केला होता. उर्वरित चौथरा आणि आजुबाजूच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत पडल्याने पुतळ्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्या होत्या.


जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात-


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र, 26 ऑगस्टला ब्राँझचा हा 28 फुटी पुतळा कोसळला होता. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे जवळपास 8 दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला कल्याणमधील त्याच्या घराबाहेरुन आपटेला ताब्यात घेतले होते.  


आणखी वाचा-


जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च