मुंबई : रांगेत उभे आहेत, तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.


तूर खरेदी थांबवल्याच्या मुद्द्यावर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तूर खरेदी तात्काळ सुरु करण्याची मागणी केली. त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांनी तूर खरेदी करणार असल्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती रामदास कदम यांनी बैठकीनंतर दिली.

नाफेडने 22 एप्रिलनंतर तूर खरेदी थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाखो क्विंटल तूर सध्या पडून आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही तूर खरेदीबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल होती. त्यामुळे 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी रामविलास पासवान यांच्याकडे केली.

22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांना टोकण मिळालेले आहेत, त्यांची तूर खरेदी केली जाईल. मात्र ज्यांच्याकडे टोकण नाहीत, त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच तूर विकावी लागणार आहे.

व्यापाऱ्यांकडे 4 हजार रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जाते. तर सरकारकडून नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत तूर नाफेडच्या केंद्रांवर आणता आली नाही, त्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय


काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक


तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च


तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना


नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा