शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं खळबळजनक वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2019 07:12 PM (IST)
बराच गोंधळ होऊन अखेर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवलं. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता मनोहर जोशी यांनी हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं हेच चांगलं आहे असं मला वाटतं. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलं आहे. मात्र सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचं दिसतं आहे असं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. जोशी यावेळी बोलताना म्हणाले की, छोट्या मोठ्या गोष्टीवरुन झगटा करण्यापेक्षा काही गोष्टी सहन कराव्या. काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील त्या सांगाव्यात. एकत्र काम केलं तर दोघांच्याही फायद्याचं ठरेल. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्ताने किंवा आपला पक्ष पसरवण्याच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर कधीच जाणार नाहीत असं नाही. योग्य वेळ येताच उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे मनोहर जोशी यावेळी म्हणाले. माझ्या मते भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र राहयला हवं. मात्र सद्यस्थितीत हे दोन पक्षांना हे मान्य असावं असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.