औरंगाबाद : शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानकारक बाब आहे. सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि शेतकऱ्यांच्या पदरात सकारात्मक मिळालं. शिवाय सरकारनेही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं.


सरकार आणि सुकाणू समितीच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दोन प्रकारचे कर्ज असतात. एक अल्प मुदतीचं कर्ज असतं आणि दुसरं दीर्घ मुदतीचं कर्ज असंत. मात्र सरकारने सरसकट कर्जमाफी केली आहे. त्यामुळे सर्वांचंच कर्ज माफ होईल, म्हणून सरकार अभिनंदनाला पात्र आहे. फक्त आता या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असंही शरद पवार म्हणाले.

''नव्याने कर्ज मिळवून कामाला लागा''

यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. सरकारने खरीपाच्या तोंडावर कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उद्यापासून नव्याने कर्ज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर नव्याने कर्ज पदरात पाडून घ्यावं, असंही पवार म्हणाले.

''सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी''

सरकारने तत्वतः सरसकट कर्जमाफी केली आहे. शिवाय त्याला काही निकषही आहेत. त्यामुळे या तीन शब्दांविषयी चिंता वाटते. त्यामुळे सरकारने सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी, असंही शरद पवार म्हणाले.

सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये सरकारच्या उच्चाधिकार समितीने सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुढील आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 26 जुलै ही डेडलाईन देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

सरकारच्या निर्णयानंतर बच्चू कडूंचं सुतळी बॉम्ब फोडून सेलिब्रेशन


सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य, शेतकरी आंदोलनाला ऐतिहासिक यश