Satara Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, सातारा (Satara) जिल्ह्यात देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.  


अतिवृष्टी कालावधीत घराबाहेर पडण्याचे टाळावे 


आज सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरु असताना नागरिकांनी झाडाखाली थांबू नये असे आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच ओढे नाले नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये, महत्त्वाचे काम नसल्यास अतिवृष्टी कालावधीत घराबाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहन देखील जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलं आहे.


राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


राज्याच्या विविध भागात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


आजपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज


दरम्यान, आजपासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. या सप्टेंबर महिन्यात राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: