सांगली : महाविकास आघाडीमध्ये अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघावर अनुक्रमे ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. सांगलीच्या जागेवरून ठिणगी पडली असतानाच आता भिवंडीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आल्याने काँग्रेसच्या गोठात कमालीशी अस्वस्थता आहे. दरम्यान, सांगलीच्या जागेवरून सुरू असलेला गल्ली ते दिल्ली वाद सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आहेत. संजय राऊत सांगलीमध्ये पोहोचताच ही जागा काँग्रेसला सुटत नसल्याने कमालीचे नाराज झालेले आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील तातडीने खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल आहेत. 


त्यामुळे सांगली लोकसभेवरून काही तोडगा निघतो का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत सांगलीमधून शिवसेना माघार घेणार नाही, विशाल पाटील यांच्यासाठी दोन पर्याय समोर आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये राज्यसभेचा एक पर्याय देण्यात आला असून दुसरा पर्याय विधानसभेला उभं राहिल्यास पूर्णतः त्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. 


संजय राऊतांच्या सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर भेटीगाटी


आज संजय राऊत यांनी सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर भेटीगाटी केल्या. कवठेमहांकाळमध्ये जाऊन त्यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर शिवसेना पदाधिकारी देखील सोबत होते. अजित घोरपडे यांची कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये लक्षणीय ताकद आहे. त्यामुळे या भेटीला राजकीय महत्त्व आहे. 


दुसरीकडे संजय राऊत यांनी सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर सांगली लोकसभेवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. सांगलीची जागा शिवसेना लढणार असल्याचा पुनरुचार पुन्हा एकदा त्यांनी केला. ते म्हणाले की, विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्याविषयी आम्हाला प्रेम असून विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार आहे.


आमची सत्ता येताच नारायण राणे तिहारच्या जेलमध्ये असतील


नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला सुद्धा संजय राऊत यांनी यावेळी उत्तर दिले. ते म्हणाले की दोन महिन्यात आमची सत्ता येताच नारायण राणे तिहारच्या जेलमध्ये असतील असा टोला त्यांनी लगावला.राणेंची ईडी आणि सीबीआयची फाईल बंद झाल्यात, आम्ही सत्ता आल्यानंतर उघडणार असल्याचे ते म्हणाले.


काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी सुद्धा ठाकरे गटावर आरोप केले आहेत. सांगलीच्या जागेचा निर्णय दिल्ली दरबारी होणार असून दिल्लीतून निर्णय आल्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ असं त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती, निमंत्रण नसल्याचे विक्रम सावंत यांनी म्हटलं आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांची बैठक उद्या नियोजन करण्यात आला असून आज सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष नेत्यांना शिवसेनेकडून अधिकृत निरोप देण्यात येईल, अशी भूमिका ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी घेतली आहे.


इतर मह्त्वाच्या बातम्या