Sangli Crime : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Employees Salary) भय संपत नाही, अशीच स्थिती कर्मचाऱ्यांची झाली आहे. पगार वेळेत न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतून एसटी चालकाने आयुष्याचा शेवट केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात घडली आहे. कवठेमहांकाळ बस आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी (रा. शिरढोण ता. कवठेमहांकाळ)  यांनी आज (16 फेब्रुवारी) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. भीमराव हे एसटीमध्ये कायम कर्मचारी आहेत. ग्रामीण मार्गावर ते चालक पदावर काम करत होते. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला नसल्याने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. मात्र, आत्महत्या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.


दरम्यान, काही एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता महिन्याच्या सात तारखेपर्यंत पगार होतो. मात्र 16 तारीख येऊनही पगार झालेला नाही, अशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आर्थिक कारणातूनच सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली, असा दावा काही एसटी कर्मचाऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. 


एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार रखडला


दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या महामंडळाची अर्थ विभागाकडून कोंडी होताना दिसत असल्याचे चित्र आहे. अर्थ विभागाकडून आतापर्यंत सरकारनं दिलेल्या निधीचे विवरण सादर करण्याचे एसटी महामंडळास सांगितले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यातील पगार रखडला असून आणखी काही काळ तो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडे असलेले परिवहन खातं आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अर्थ खात्यामध्ये बेबनाव असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.  


एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकीत असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी 360 कोटी रुपये मिळायला हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्यानं महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकीत रक्कम मागितली होती. मात्र, अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात आज (16 फेब्रुवारी) अर्थ, परिवहन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला 7 ते 10 तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारनं कोर्टात दिले होते.  


इतर महत्वाच्या बातम्या