संगमनेर : पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव अभिनेत्री दिशा पटानीसोबत अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यावरुन संगमनेरमध्ये मेधा महोत्सवात अवधूत गुप्तेनं आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनीही मिश्किल उत्तर दिलं. आदित्य ठाकरेंना अवधूत गुप्ते यांनी रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची? असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असं उत्तर दिलं. यावर अवधून गुप्ते यांनी पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं…आपका उत्तर हमको 'पटनी' चाहिये ? म्हणत अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचा उल्लेख केला. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं.


संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला. दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली. धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास उत्तरं दिली.


आदित्य यावेळी म्हणाले की, आईने आधीच जबाबदारी सोडली आहे. आई मला नेहमी राजकारणात जाऊ नको असं सांगायची. तुझे वडील, आजोबा राजकारणात आहेत. जसं पेपरमध्ये चांगलंही लिहिलं जातं तसं वाईटही. तिने मला आमदार होण्याआधी विचारलं का ? मी लढू शकतो असं विचारलं का ? असंही विचारलं होतं. त्यामुळे पुढचं काही ठरलं नसून आई सगळं ठरवणार आहे. यावेळी फोन अ फ्रेंडच्या वेळी आदित्य म्हणाले मी झिशानच्या वडिलांना फोन करतोय. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी दिशाचं लग्न लवकर करावं म्हणजे माझा फॅन फॉलोविंग वाढेल, असं म्हणताच हशा पिकला.

रोहित पवार म्हणतात 'मोदी साहेब माझं नाव तर ऐकलं असेल'

यावेळी रोहित पवार यांना फोन लावायला सांगितला असता त्यांनी सरळ पंतप्रधान मोदींना फोन लावला. ते म्हणाले मोदीजी मी, रोहित. नाव तर ऐकलं असेलच. त्यांनी असं म्हणताच एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले की, आजोबा शरद पवारांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही असं शिकवलं. अनेक जणांना वाटायचं की पवारसाहेब निवृत्त होतील. पण शरद पवार यांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अवधूत गुप्ते यांनी रोहित पवार यांनी हडपसरचे जावई असूनही कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? असा मिश्कील प्रश्न विचारला. यावर रोहित पवार यांनी ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं असं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मी जिंकलो म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी नव्हतं. तर मला इतकं बहुमत मिळालं म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. विजयात माझ्या आईचा वाटा मोठा आहे, असेही रोहित पवार म्हणाले.