राजापूर: काही शकुनी प्रवृत्तीचे लोक सत्ताधाऱ्यांसोबत आहेत, त्यामुळे आता त्यांचा विजय होईलही... पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात जेव्हा आम्ही उतरू त्यावेळी निश्चितच आमचा विजय होईल असं वक्तव्य शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलं आहे. बारसू रिफायनरीच्या (Barsu Refinery) आंदोलनाच्या वेळी सरकारने महिलांवर लाठीचार्ज केला, इकडे आल्यावर खरी परिस्थिती समजते असंही त्या म्हणाल्या. राजापूरमध्ये सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

  


शकुनी प्रवृत्तीचे लोक सत्तेमध्ये


शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले आहेत, पण राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. शकुनी नावाचा माणूस जोपर्यंत कौरवांच्या बाजूने होता तोपर्यंत कौरव पटावर जिंकत होते. पण कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला. त्याच पद्धतीने काही शकुनी प्रवृत्तीचे लोक सत्ताधाऱ्यांसोबत आहेत. त्यामुळे डाव जिंकतीलही. पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्र जेव्हा आम्ही उतरू तेव्हा विजय आमचा असेल.


Sushma Andhare On Barsu Refinary : बारसू रिफायनरीवर काय म्हणाल्या? 


सुषमा अंधारे म्हणाल्या की, "मन की बात खूप झाली, आता जन की बात होऊ जाऊ दे. एकीकडे सरकार म्हणतंय की राजापूरमध्ये तसं काही झालंच नाही, मात्र इकडे आल्यानंतर खरी परिस्थिती समजते. या ठिकाणच्या महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला. एकेक अनुभव हा अंगावर शहारा आणणारा आहे. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना ही या ठिकाणच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे."


दोन्ही गटांना एका आठवड्याचा वेळ


शिवसेनेचे  कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र याचा निर्णय आता एक आठवड्यानंतर होणार आहे. कारण आजच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र अध्यक्षांनी तूर्तास तरी दोन्ही गटांना आठवड्याचा अवधी दिला आहे.  


शिवसेनेच्या पात्र-अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीला आज सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या आमदारांना प्रत्यक्ष विधानभवनात हजर राहण्याच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या होत्या. या सुनावणीला शिंदे गटाचे 21 तर ठाकरे गटाचे 14 आमदार उपस्थित होते. सर्व याचिका स्वतंत्र आहेत, त्यामुळे या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी होईल, असं अध्यक्ष नार्वेकर सुनावणीदरम्यान म्हणाले. शिंदे गटाकडून निहार ठाकरे तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.


ही बातमी वाचा: