मुंबई : ठाकरे बंधू आमच्या भूमिकेसोबत असल्याची प्रतिक्रिया बारसू रिफायनरी (Barsu Refinery) विरोधी संघटनांनी एबीपी माझासोबत बोलतांना दिली आहे. तर गणेशोत्सवानंतर राज ठाकरे स्वत: बारसूला येणार असल्याची माहिती देखील यावेळी या संघटनांनी दिली आहे. बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी सोमवार (12 सप्टेंबर) रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बारसू रिफायनरीचा विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनामधील अनेक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यासाठी शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.  


दोन्ही ठाकरे बंधू आमच्यासोबतच


'कोकणातला मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांचा मतदार आहे. तोच  मतदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा देखील आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गणेशोत्सवानंतर बारसूला जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. सुरुवातीपासूनच तिथे रिफायनरी नको अशी भूमिका राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूच घेतली. कातळ शिल्पांचे संवर्धन झालेच पाहिजे असं देखील राज ठाकरेंचं म्हणणं आहे',  अशी प्रतिक्रिया बारसू रिफायनरी संघटनांनी दिली आहे. रिफायनरीच्या विरोधात स्थानिक जनतेसोबत दोन्ही ठाकरे बंधू आहेत यात शंकाच नाही, असं देखील या संघटनांनी म्हटलंय. 


...मग आमच्यावरचे गुन्हे का मागे घेत नाही?


मराठा आंदोलनकांवरील जर गुन्हे मागे घेतात तर कोकणवासीयांवर दाखल झालले गुन्हे कधी मागे घेणार असा सवाल या संघटनांनी विचारला आहे. कोकणात होणाऱ्या बारसू प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून तीव्र विरोध करण्यात आला. त्यासाठी विविध स्तरावर आंदोलनं देखील करण्यात आली. या आंदोलकांवर त्यानंतर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे बारसू विरोधी संघटना आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणावरील सर्व आंदोलकांचे निर्णय मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आमच्यावरील देखील गुन्हे मागे घेण्याची मागणी बारसू रिफायनरी विरोधी संघटनांकडून करण्यात येत आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज यांच्यामध्ये पश्चिम किनारपट्टी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. यावर देखील या संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'हा प्रकल्प करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, या म्हणण्यामध्ये काहीही अर्थ नाही. याला आम्ही फार गांभीर्याने घेत देखील नाही. त्यांनी समिती जरी गठित केली तरी आम्ही बारसूला विरोध करत राहूच. आम्ही रिफायनरी होऊ देणार नाही.' 


हेही वाचा : 


एक महिन्याचा वेळ देतो, त्यानंतर एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही; मनोज जरांगे आक्रमक