रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) येथे व्हेल माशाचं (Whale Fish) रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं. व्हेलला जिवंत पाण्यात सोडण्याचं हे देशातील पहिलं रेस्क्यु ऑपरेशन ठरलं आहे. तब्बल 40 तास या ठिकाणी व्हेलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर रात्री उशिरा व्हेल माशाचं पिल्लु समुद्रात सुखरूप गेले.
दरम्यान, हे ऑपरेशन यशस्वी होऊन जवळपास नऊ तास होऊन गेलेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनला 12 तास लोटलेले आहेत. त्यामुळे सदरचं पिल्लू सुरक्षित असावं असा आशावाद आहे. व्हेल हा सस्तन प्राणी आहे. शिवाय, व्हेल माशाचा पिल्लाला calf म्हणून देखील ओळखलं जातं.
40 तास बचाव मोहीम
गणपतीपुळे समुद्रकिनारी चाललेलं ऑपरेशन व्हेल अखेर 40 तासानंतर यशस्वी झाले. कोस्टगार्डसह सर्वच विभागांनी यामध्ये पुढाकार घेत अखेर व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सुखरूप सोडलं. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं. समुद्रामध्ये जवळपास 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये या वेल माशाच्या पिल्लाला सोडल्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सर्वांनी जल्लोष केला.
सोमवारी, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर असल्याचं दिसून आलं. दरम्यान, 13 नोव्हेंबर रोजी जवळपास तीन वेळा यावेळी माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडलं गेलं. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा 'ऑपरेशन व्हेल' सुरू करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सोडण्यात यश आलं. हे ऑपरेशन यशस्वी झालेलं असलं तरी इतर कुठल्या भागामध्ये हे पिल्लू किनारपट्टीवरती मागे फिरत नाहीये ना? याकडे देखील सध्या लक्ष ठेवले जात आहे.
20 फूट लांब, 5000 किलो वजन
तब्बल 20 फूट लांब आणि पाच टन वजनाचा हा व्हेल माशाचे पिल्लू होते. पर्यटक, स्थानिक नागरीक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
बेबी व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. भरतीच्या वेळी समुद्रात पाठवण्याचे दोनदा प्रयत्न केले. पण हा मासा पुन्हा किनाऱ्यावर आला आहे. दोन क्रेनच्या साह्याने या पाच टन वजनाच्या व्हेलला हलवणे कठीण झाले होते.