रत्नागिरी: ज्या काँग्रेसने देशाला लुटलं, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट घडवले त्यांच्यासोबत केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलात अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. काश्मीरमधील 370 कलम मोदींनी हटवलं, ज्यांना राम मंदिराची उभारणी केली, ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यासोबत जाण्याची आमची भूमिका चुकीची कशी असा सवालही त्यांनी विचारला. हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे, शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखं सत्तेसाठी मिंधे झालेलो नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. काही दिवसांपूर्वी खेडच्या याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याच मैदानावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 


एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आधी मुख्यमंत्री होणार नाही असं सांगितलं. त्यानंतर पवार सांहेबांनी सांगितलं असं म्हणत मुख्यमंत्री झालात. तेही ठिक, पण त्यानंतर तुम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडली. बाळासाहेबांचा विचार बाजूला सोडला आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालात. सोनिया गांधी आणि  


कोकणातल्या लोकांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं, त्यांच्या विचाराला पाठिंबा दिला, तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय, त्यामुळे कोकण आपल्यासोबत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोकणातले सगळे शिलेदार आपल्यासोबत आहेत, त्यामुळे आम्हाला कुणाला उत्तर द्यायची गरज नाही असंही ते म्हणाले. 


तुम्ही खोके, गद्दार म्हणून कितीही पाप केलं, बाळासाहेबांच्या विचारांना संकुचित केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात या मैदानात एक फुसका, आपटी बार येऊन गेला. मी काही त्याला उत्तर द्यायला आलेलो नाही. तोच तो थयथयाट, आदळाआपट... याला काय उत्तर देणार? तोच खेळ सुरू आहे, पण जागा बदलली आहे. 


महाराष्ट्राभर त्यांचे सर्कशीप्रमाणे खेळ होणार आहेत. खोके आणि गद्दार हे दोनच शब्द आहेत. त्याशिवाय तिसरा शब्द नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात अर्थ नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.


एकनाथ शिंदे म्हणाले की, "आजच्या सभेला झालेली गर्दी पाहून त्यांना प्रश्न पडला असेल. कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यांच्या मागे कोकणी माणूस आहे. आजही हा कोकणी माणूस त्यांच्या विचारांच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्हाला आता उत्तर देण्याची गरज नाही.  कोकणी माणून वरून फणसासारखा, पण आतून हळवा असतो. तो एकदा शब्द दिला तर परत फिरत नाही." 


कोकणातले शिलेदार माझ्यासोबत


कोकणातल्या आमदारांनी मला पाठिंबा दिला, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेनेच्या आमदारांनी जर आपल्या भूमिकेला पाठिंबा दिला नसता तर वेगळंच घडलं असतं.


जेव्हा आमचं घर जळालं होतं त्यावेळी कोकणातल्या भावकीने आम्हाला साथ दिल्याचं आपल्या वडिलांनी सांगितलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


गद्दार आम्ही नाही, गद्दारी 2019 ला झालेली 


गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी तुम्ही 2019 साली केली, सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी केली अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.  ज्यांनी मुंबईत बॉंबस्फोट घडवले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला असंही ते म्हणाले. 


एकनाथ शिंदे म्हणाले की, "सत्तेसाठी त्यांनी काय काय केलं हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ती आम्ही सोडवली. ज्या लोकांच्या बरोबर आम्ही निवडणूक लढवली त्यांच्यासोबत गेलो. हिंदुत्वाला लागलेला डाग आम्ही पुसण्याचं काम केलं."