Montha Cyclone Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मोंथा' चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येत असून समुद्रही खवळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात शेकडो नौका सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्या आहेत. समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र (Arabian Sea) या दोन्ही समुद्रात सध्या खवलेले असून याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी देवगड बंदरात सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. 

Continues below advertisement

अरबी समुद्रात उठलेल्या वादळांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या तीन बोटींचा संपर्क तुटला आहे. उरणमधील न्हावा शेवा गावातील या तीन बोटी असून यावर जवळपास 50 खलाशी आहेत. कोस्ट गार्ड आणि बोट मालकांशी बेपत्ता बोटींचा संपर्क होत नसल्याने 50 खलाशांच्या जिविताची चिंता सध्या त्यांच्या कुटुंबीयांना लागली आहे. श्री गावदेवी मरीन आणि चंद्राई नावाच्या दोन बोटी सत्यवान पाटील यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी आपल्या दोन बोटींचा अद्याप संपर्क होत नसल्याचे सांगितले आहे.  कोस्ट गार्ड , नेव्ही , मत्स विभाग यांच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या बोटींचा शोध घेतला जात आहे.

Gateway to Mandwa Ferry boat: गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा पुन्हा आज बंद  

एकीकडे मोंथा वादळाचा तडाखा आणि दुसरीकडे कोकण किनारपट्टीला पावसाचा असलेला अंदाज लक्षात घेत समुद्र खवळण्याची शक्यता आहे.त्यामुळे मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया ही जलवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि अस्थिर हवामानामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारी म्हणून जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. मालदार कॅप्टन ही बोट तात्पुरत्या स्वरूपात सुरू राहणार आहे. मात्र इतर बोटी बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या तीन नंबरच्या इशाऱ्यानंतर अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील सुद्धा सर्व मच्छिमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावरच विसावलेल्या आहेत.

Continues below advertisement

Konkan Rain: कोकणात पावसामुळे आंबा, काजू संकटात

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात पाऊस लांबला आहे. याचा परिणाम काजूवर देखील झाला आहे. काही ठिकाणी काजूला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, पाऊस लांबल्याने तो मोहोर गळून पडला आहे. तर आता पुन्हा मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. तसेच पाऊस पडत असल्याने काजूवर बुरशीजन्य रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तवली आहे. काजूवर थ्रीप्स चा प्रादुर्भाव पालवीच्या व पानांच्या देठांवर आढळून येतोय. पावसाचा  परिणाम झाल्याने करपा, शेंडेमर, फांदीमर यासारख्या रोगांमुळे नुकसान होत आहे. तर हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अती पावसामुळे काही ठिकाणी मर रोंग देखील काजूच्या झाडाला लागून काजूची झाड सुकून जात आहेत.

Jalgaon Rain: जळगावच्या गिरणा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यांतील शेतीचे मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्यातील गिरणा परिसरात अवकाळी पावसाचा जोर कायम असून सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यांत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातगाव डोंगरी आणि अजिंठा डोंगर परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी चक्क जेसीबी चा वापर केला. तर आंबेवडगाव व डांभुर्णी दरम्यान असलेल्या गोगडी नाल्याला पूर आल्याने काही तासांसाठी वाहतूक खोळंबली होती. 

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, लोहारा, कुऱ्हाड आणि वरखेडी या गावांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, आडगाव, बहाड, पातोंडा आणि उंबरखेड परिसरातही पावसाने कहर केला. मन्याड व गिरणा प्रकल्प भरून पाहू लागल्याने मोठ्या प्रमाणात दोन्ही धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा नदीला पूर आला आहे. भडगाव तालुक्यातील महिंदळे आणि जुवार्डी गावांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या सततच्या पावसामुळे केळी, मका, कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

आणखी वाचा

'मोंथा' चे संकट, विदर्भासह कोकणातही पावसाचा अंदाज; राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, कसं राहील हवामान?