पुणे : मुंबई-पुणेदरम्यान आज सायकल शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल शर्यतीदरम्यान आयोजक आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सायकलपटूंना बसला आहे. यावेळी सायकलपटू आणि त्यांच्या पालकांना रडू कोसळलं.


पुण्यातील जंगली महराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर या सायकल शर्यतीचा शेवट होणार होता. मात्र सायकलपटू जवळ आले असतानाही या रस्त्यावरील वाहतूक तशीच सुरु ठेवण्यात आली. त्यामुळे काही सायकलपटू फिनीश लाईनच्या अलीकडेच वाहनांना धडकून खाली पडले. तर काहींना वाहतुकीमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागला.

शर्यत जिंकण्यासाठी अपार मेहनत घेतलेल्या खेळाडूंना यामुळे रडू कोसळलं. मात्र हा प्रकार सुरु असतानाही आयोजक आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असलेले पाहायला मिळाले. ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या सायकलपटूंनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या सायकल शर्यतीत दिलावर, कृष्णा नायडू आणि संदेश उप्पर या सायकलपटूंनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.