पुणे : टेमघर धरणाच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असली तरी धरणाला मोठा धोका नाही, असा अजब तर्क जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लावला आहे. धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या पाणीगळतीची बातमी 'एबीपी माझा'नं दाखवल्यानंतर काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली होती.


 
पाहणी केल्यानंतर या धरणाला फार मोठा धोका नसल्याचं प्रमाणपत्रं महाजन यांनी देऊन टाकलं. त्यामुळे जलसंपदामंत्री महाजन कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणाच्या गळतीमुळे निर्माण झालेले प्रवाह पाहिल्यानंतर टेमघरला तडे तर गेले नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

 

 

गिरीश महाजन यांच्या माहितीनंतर टेमघरच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला जलतज्ज्ञ विजय पांढरे यांनी दिला आहे. त्यामुळे महाजन यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

 

पुण्यातील टेमघर धरणातून मोठी पाणी गळती, तडे गेल्याची भीती


 

 

धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडं झुडप उगवली आहेत. श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि सोमा कन्स्ट्रक्शन या कंपन्यांकडून या धरणाचं काम करण्यात आलं. सोमा कन्स्ट्रक्शन ही कंपनी अविनाश भोसलेंशी संबंधित आहे. धक्कादायक बाब म्हणजे धरणाचं काम पूर्ण होऊन फक्त पंधरा वर्षेच लोटली आहेत.