पुणे: पुण्यातील कचराकोंडी गेले 19 दिवस कायम आहे. डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला सतत लागणाऱ्या आगीमुळे फुरसुंगीकरांचं जगणं मुश्कील झालं आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या कचरा डेपोला जोरदार विरोध केला आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवार) फुरसुंगीला भेट दिली. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


हा परिसर कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त व्हावा अशी मागणी करत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज कचऱ्याची प्रतिकात्मक अंतयात्राही काढण्यात आली.

'या कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी याआधीच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. तेव्हा ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पंरतु अद्याप त्यांनी आपला शब्द पाळला नाही.' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, याप्रकरणी मोदींनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. 'देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरु असताना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारं पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घालावं आणि यावर तोडगा काढावा.' असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.



काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न? 

पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे. 

इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.

त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 18 दिवस केल्यास, 20 हजार टन कचरा पुणे शहरात पडून आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दोन वर्षापूर्वी आश्वासन 

पुणे आणि फुरसुंगी कचऱ्याचा प्रश्न हा आज-कालचा नाही. दोन वर्षापूर्वीही हा प्रश्न पेटला होता. फुरसुंगीकरांनी पुण्याचा कचरा टाकू न देण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, त्यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन गावकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दिलं होतं.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील डंपिंगसाठी पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी 31 डिसेंबर 2014 पर्यंतची मुदत मुख्यमंत्र्यांनी मागितली होती.  त्यामुळे उरळी आणि फुरसुंगी गावांनी त्यावेळी पुकारलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं. 

महापौर परदेश दौऱ्यावर

दरम्यान, महापौर मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित परिषदेसाठी आठ दिवस मेक्सिको दौऱ्यावर आहेत. तर पालकमंत्री गिरीष बापट हे 2 मे ते 11 मेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न नेमका कसा निकाली निघणार याकडे पुणेकरांचे डोळे लागून राहिले आहेत.

संबंधित बातम्या:

19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य


आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट


पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’

17 दिवसांपासून पुण्यातील कचराकोंडी कायम, नेते परदेश वारीवर