पुणे: तमाम महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४ वी जयंती (Shivjayanti 2024) आहे. यानिमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्माचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. त्यांनी शिवरायांच्या (Shivaji Maharaj) कार्यकुशलतेचे कौतुक करताना म्हटले की, छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते, तेवढेच व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली: एकनाथ शिंदे


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यावेळची आठवण सांगताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही.  लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखं भारतामध्ये आणली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.



पंतप्रधान मोदींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा


पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी एक व्हिडीओ ट्विट करत नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी या ट्विटमध्ये शिवरायांच्या कार्याची माहिती विशद केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.


गडकिल्ल्यांच्या विकासातील पुरातत्त्व विभागाचा अडथळा दूर होणार: फडणवीस


शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले.  अन्याय करणारा कितीही मोठा असो देव देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढायला शिकवले. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतोय.  पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो.  मात्र, यामधे बदल करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धारासाठी ८३ कोटींचा खर्च: अजित पवार


शिवाजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन जाणारा विचार.  सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले.  महायुती सरकार गड-किल्ल्यांसाठी काम करतेय.  गडासाठी 83 कोटी खर्च करण्यात आलेत.  याबरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मला मुख्यमंत्र्यांनी केलेय. या भागातील आदिवासी समाजाला हीरडा पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


आणखी वाचा


आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा! झुलवा पाळणा, पाळणा, बाळ शिवाजीचा...