पुणे : जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून शिवसेना (Shiv Sena) संपवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव-पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केला आहे. 


पुण्यातील बैलगाडा शर्यत ऐनवेळी स्थगित केल्यापासून शिवाजी आढळराव-पाटील पुण्याच्या कारभाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. "महाविकास आघाडी आहे तर असू द्या, ती फक्त तुमच्या फायद्याची आहे" असं म्हणत आढळरावांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली.


शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, "गेली दोन वर्षे आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये आहोत. पण पुणे जिल्ह्यात आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वार केले जात आहेत. या माध्यमातून पुण्यातील शिवसेना संपवण्याचं काम केलं जात आहे. पण आम्ही नेटाने तग धरून लढा देत राहू. महाविकास आघाडी म्हणून आमचं एकच म्हणणं आहे. पुण्यातील शिवसैनिकांना संपवू नका. त्यांना शिवसैनिक म्हणून जगू द्या, अशी खंत आढळराव-पाटील यांनी व्यक्त केली आहे. 


दरम्यान, शिवाजी आढळराव-पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुणे जिल्ह्यातील महाविकासआघाडीत बिघाडी कायम असल्याचं समोर आलं आहे. पक्षश्रेष्ठी आता यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 


का आहे शिवाजी आढळराव-पाटील यांची नाराजी?
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होतो. शर्यतीच्या आधल्या रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. परंतु, या निर्णयावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या


खासदार अमोल कोल्हे यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध : माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील


OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा डेटा कधीपर्यंत मिळणार? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती