पुणे : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सरकारला दिलेली मुदत संपायला दोन दिवस आहे. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष आहे. सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये संवाद झाल्याची शक्यता आहे. त्यांनी जर चांगला निर्णय घेतला तर आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. ते बारामतीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. आंतरवली सराटीनंतर त्यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात सभा घेतल्या. त्यात सरकारला वारंवार 24  ऑक्टोबर म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेल्या मुदतीची आठवण करुन दिली आहे. त्यासोबतच मराठ्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आणि आत्महत्येचं पाऊल न उचलण्याचं आवाहन करत आहे. आज ते पत्रकारपरिषद घेणार आहेत. त्यात त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सर्व नेत्यांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वी शरद पवारांनी जरांगे पाटील आणि सराकरमध्ये संवाद झाल्याचं म्हटलं आहे. 


कंत्राटी भरतीला विरोध का केला?


त्यासोबतच शरद पवार यांनी कंत्राटी भरतीबाबत सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपावरदेखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, कंत्राटी भरतीच्या निर्णयासाठी माझा आशीर्वाद मी वाचलं. मी मंत्रिमंडळ बैठकीत जात नाही. कंत्राटी कामामध्ये ठराविक काळासाठी भरती होते. त्या व्यक्तीच्या आयुष्यात स्थैर्य राहत नाही म्हणून आमचा विरोध होता.


प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत दिसले तर आनंदच!


इंडिया आघाडीत जे लोक सहभागी होतील त्याचा आनंद आहे पण कालची बैठक वेगळी होती.आंबेडकर यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे पुस्तक लिहले होते त्याला 100 वर्ष पूर्ण झाली त्याचा कार्यक्रम होता. मात्र प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत दिसले तर आनंद होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


बावनकुळेवर निशाणा


चंंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, अशा शेलक्या शब्दांत शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. बावनकुळे यांनी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन विरोधकांना नाक घासून माफी मागा, असा हल्लाबोल केला होता.


इतर महत्वाची बातमी-


मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा काळकुटे कुटुंबियांना शब्द