पुणे : बारामतीतील नव्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या निर्मितीसाठी 25 कोटींची गरज होती, त्यासाठी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मदत केल्याचं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे आभार मानले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबेटिक लॅबचे उद्घाटन शरद पवार आणि फिनॉलेक्स कंपनीचे दीपक छाबरिया यांच्या हस्ते झालं. त्यावेळी शरद पवारांनी अदानींचे आभार मानले. 


बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने बोलताना शरद पवार म्हणाले की, आपण संस्थेच्या मार्फत जगातलं पहिलं नव टेक्नॉलॉजी सेंटर बनवत आहोत. याला 25 कोटी रुपये लागणार होते. त्यासाठी 25 कोटी रुपयांचा धनादेश गौतम आदानी यांनी दिला आहे. त्यांचं नाव या ठिकाणी मला घेतलं पाहिजे. 


आपल्या भागात उसाची शेती जास्त आहे. उसाची साखर बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे ते जगात झपाटयाने बदलत आहे. असे तंत्रज्ञान इथं आणता येईल का याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जगात जे नवं आहे ते सगळं आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असं शरद पवार म्हणाले. 


शरद पवार म्हणाले की, इंजिनिअरिंग क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा वापर झपाट्याने वाढत आहे. आपण देखील नवा बदल स्वीकारला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करणाऱ्या लोकांची देशाला आणि जगाला गरज निर्माण झाली आहे. आज आपण बारामतीत जे बनवत आहोत त्याचा उपयोग सगळ्या विद्यार्थ्यांना होईल. 


जगातील भरपूर वस्तूच्या उत्पादनाचा ओघ चीनकढे आहे, तो ओघ भारताकडे कसा आणला जाईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, भारताकडे तरुणांची मोठी शक्ती आहे. अनेकदा भारताला तरुणांचा देश म्हणलं जातं. या सगळ्या तरुण शक्तीचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. प्रत्येक बदल हा आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जात असतो. 


शरद पवारांकडून अदानींचे नेहमी कौतुक


एकीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि इतर काही पक्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे त्याच आघाडीचे घटक असलेल्या शरद पवारांनी मात्र आपली भूमिका कायम ठेऊन अदानींची पाठराखण केली आहे. देशातील उद्योग विकासामध्ये गौतम अदानींचं मोठं योगदान असून असल्याचं शरद पवारांनी या आधीही सांगितलंय. तसेच गौतम अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून चौकशी करा या राहुल गांधीच्या मागणीलाही त्यांनी विरोध केला होता. 


देशातील सर्व प्रमुख उद्योगपतींचे आणि शरद पवारांचे संबंध चांगले आहेत. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर या प्रमुख उद्योगपतींनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केल्याचं समोर आलं आहे. गौतम अदानी यांनीही याआधी अनेकदा शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली, त्यांचा सल्लाही घेतल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे एकीकडे काँग्रेसकडून अदानी यांच्यावर टीका सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवल्याचं दिसून येतंय. 


ही बातमी वाचा :