पुणे : स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू (Pune Metro) करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर  राज्य सरकारच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मेट्रो मार्ग आणि अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करावी. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रो लाईन सुविधा देण्याचा विचार व्हावा. 


अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने या भागात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. नगर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही तातडीने करावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असेही आदेश त्यांनी दिले. 


केंद्राच्या मान्यतेची प्रतिक्षा


बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना  स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे विचाराधीन आहे. लवकरच त्यास मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, यानंतर या मार्गावरील काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार


पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या  प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं होतं. स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजुरी घेईल. खडकवासला ते खडारी हा 25.65 किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं होतं. आता फक्त या मेट्रोसाठी केंद्राच्या मान्यतेची गरज आहे ती मान्यता मिळाली की मेट्रोचा मार्ग मोकळा असेल. 


महत्वाच्या इतर बातम्या :


कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न, अजित पवारांची स्पष्टोक्ती