पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मशाल मोर्चा काढण्यात आले आहे. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तसंच प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजातही या मोर्चात सहभागी झाला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.


संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करुन या मोर्चाला सुरुवात झाली. मशाल पेटवून हलगीच्या तालावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवकांनी आणि युवतींनी मोर्चात घोषणाबाजीही केली. सावित्रीबाई फुले विद्यापीठापासून निघालेला हा मोर्चा जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आला तेव्हा युवक-युवतींनी गाणी सादर केली आणि त्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला. विद्यापीठातील पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, या कायद्याच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले हे त्यांचं समाजभान पाहून कौतुक वाटले. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलं आहे. पण युवाशक्ती त्यांना जागं केल्याशिवाय राहणार नाही.माझ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणी या कायद्याच्या विरोधात ठामपणे उभे आहेत. हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. तो कोणालाही शरण जाणार नाही.आपला देश ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही व्यवस्था टिकविण्यासाठी आपण महात्मा गांधीजींनी दाखवून दिलेल्या शांततेच्या मार्गाने ही लढाई लढत राहू आणि स्वाभिमानाने जगू.


पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना हिटलरशी करणारे फलक यावेळी विद्यार्थ्यांनी हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. देशाच्या घटनेच्या हेतूलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे फलकही आंदोलनातील विद्यार्थ्यांनी झळकावले.

मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळे यांनी आवाहन देखील केले आहे. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी ही लढाई शांततेच्या व सनदशीर मार्गानेच लढावी. एक नागरिक म्हणून मी सदैव तुमच्यासोबत आहे.