बारामती : तोक्ते चक्रीवादळाने गुजरात व महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतही फक्त गुजरात राज्यासाठी जाहीर केली. आम्ही सर्व आशावादी आहोत की, महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं.  महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.

केंद्राचा लसीकरणाबाबतीत नियोजनाचा अभाव

कोरोनाचे संकटात देशात दिवसाला चार लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठिकठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले. 

देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लसीचा तुटवडा पाहता केंद्र व राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरु करावी, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.