पुणे : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या कारवाईत जवळपास साडेतीनशे दहशतवादी आणि 'जैश'चे कमांडर ठार झाले आहेत. भारतीय वायुसेनेतून ग्रुप कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या दिलीप परुळकर यांनी आपण यावेळी एअर फोर्समध्ये असायला हवं होतं, अशा शब्दात आनंद व्यक्त केला.


दिलीप परुळकर यांनी 1965 आणि 1971 च्या युद्धामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी 'सुखोई' सारखी लढाऊ विमानं हाताळली आहेत. 'आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. मी स्वतः आता एअर फोर्समध्ये असायला हवं होतं.' असं परुळकरांनी सांगितलं.

भारतीय वायुसेना अशा आव्हानांसाठी सदैव तयार असते. अशा मिशनसाठी वर्षभर प्रॅक्टिस सुरुच असते. मिराज 2000 ची अवजड क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे, असं परुळकरांनी सांगितलं.



1965 आणि 1971 या युद्धामध्ये परुळकर सुदैवाने बचावले होते. तेव्हा इतकं प्रगत तंत्रज्ञान आणि लढाऊ विमानं उपलब्ध नव्हती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून जर प्रत्युत्तर दिलं गेलं, तर आपण तयार असायला हवं. असं पाऊल पाकिस्तानला परवडणारं नाही. कारण अशा परिस्थितीमधून युद्धही सुरु होऊ शकते, अशी भीती परुळकरांनी व्यक्त केली.

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक

पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर, धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.  मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. या हल्ल्यात अनेक हिटलिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आले आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला. पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

असा ठरला अॅक्शन प्लॅन

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या हल्ल्याच्या वेळी अॅक्शन रुममध्ये उपस्थित होते.
सूत्रांच्या मते दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना काही पर्याय दिले होते.
लष्कर आणि वायुसेनेने एलओसीजवळ हवाई पाहणी केली. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.
या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या कॅम्पला निशाणा बनवण्यात आले.
मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले.
मुख्य हल्ला केला त्यावेळी वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला.

पुलवामाचा बदला : ऐकले नाही म्हणून ठोकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईला दुजोरा  

जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. अजहरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली. मात्र पाकने काही पावले उचलली नाहीत. काल रात्री भारतीय वायुदलाने बालकोटमधील जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. हा हल्ला ट्रेनिंग कॅम्पवरच केला. हा कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा मेहुणा होता, असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असंही त्यांनी सांगितलं.