मुंबईत भाजप-शिवसेना युतीची शक्यता धूसर: रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2017 11:09 PM (IST)
लोणावळा: मुंबईमध्ये भाजपा-शिवसेनेची युती होण्याची शक्यता धूसर असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते खासदार रामदास आठवले यांनी केलं आहे. लोणावळ्यात झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. मुंबईत निवडणुकीपूर्वी भाजपा-सेना युती झाली नाही तरी निवडणुकांनंतर ही युती नक्की होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 'सेना-भाजपा युती झाली नाही तरी भाजपा-आरपीआय सोबत युती करेल, मात्र आरपीआयच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा अट्टाहास भाजपने धरू नये.' असा इशाराही त्यांनी दिला. जर कुणी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर त्याला पक्षातून निलंबित करण्यात येईल. असा दमही आठवलेंनी इच्छुकांना भरला. दरम्यान, दुसरीकडे भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत खलबतं सुरु झाली आहेत. आज झालेल्या पहिल्या बैठकीत तरी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी प्राथमिक बोलणी केली. मात्र, अद्याप जागा वाटपांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.