पुणे : “ लोक हल्ली डोळ्याने कमी मोबाईलनेच जास्त बघतात. मी राष्ट्रपतींना जाऊन भेटणार आहे आणि त्यांच्याकडून एक खून माफ करण्याची परवानगी मागणार आहे, कारण मला मोबाईल  निर्माण करणाऱ्याचा खून करायचा आहे,” असं तिरकस विधान राज ठाकरेंनी केलं आहे.


पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रभागातील विकास कामाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोबाईलच्या अतिवापरावरुन त्यांनी उपस्थितांना आपल्या तिरकस शैलीत टोला लगावला.

राज ठाकरेंनी कोंढवा येथील हजरत ख्वाजा मोहिनुदिन चिस्ती हॉस्पीटल आणि कात्रज येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाचं उद्घाटन केलं.

राज म्हणाले, “प्रत्येकजण आता डोळ्याने नाही तर मोबाईलनेच बघायला लागला आहे. त्यामुळेच मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन एक खून माफ करण्याची मागणी करणार आहे आणि मोबाईलचा निर्माण करणाऱ्याचा खून करणार आहे. ”

‘माझे सर्व नगरसेवक चांगले काम करत आहेत. परंतु लोक आता कामाला मतदान करतात का,’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.