पुणे : तिनं अजून डोळेही उघडले नव्हते... तिला अजून नावाची ओळखही नव्हती... तिला अजून या जगाची रीतही कळली नव्हती... त्याआधीच तिला मृत्यूच्या मिट्ट अंधारात परत पाठवलं... तेही तिच्या जन्मदात्रीनंच... कुणाच्याही काळजाचं पाणी पाणी करणारी ही घटना भर पुण्यातली आहे... भर दिवसा घडलेली आहे.


रुग्णालयातून दहा दिवसांच्या बाळाला घेऊन रिक्षाने घरी निघालं असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या हॅरिस पुलाखाली सहप्रवासी महिलेने रिक्षातून बाहेर ढकललं, असा बनाव रेश्मा शेखने केला. ती महिला रिक्षाचालकासह आपल्या बाळाला घेऊन पळून गेल्याचा दावा तिने केला. या घटनेने शहरात खळबळ माजली.

रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच बाळाला नदीत फेकलं!


बाळ चोरीला गेल्याचा टाहो फोडत रेश्मा भर रस्त्यात बसली. धाय मोकलून रडू लागली. पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली. नाकाबंदी सुरु झाली. शिवाय रेश्माची चौकशी सुरु झाली, पण तिथेच पोलिसांना काहीतरी काळंबेरं वाटलं.

रेश्माने पोलिसांना माहिती देताना रिक्षा नो एन्ट्रीतून सुसाट वेगाने गेल्याचं सांगितलं. मात्र नो एन्ट्रीतून रिक्षा सुसाट वेगाने कशी काय जाऊ शकते, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आणि तिथंच रेश्मावर संशय बळावला.

पोलिसांनी रेश्माला खोदून खोदून विचारलं, तेव्हा रेश्माने आपणच आपल्या मुलीला मुळा नदीत फेकून दिल्याचं कबूल केलं.

आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार


रेश्माला याआधी तीन मुलं आहेत. त्यातल्या दोन मुली होत्या. त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. रेश्माला पुन्हा एकदा मुलगी नको होती. एक आईच असा विचार करत असेल, तर इतरांकडून काय अपेक्षा करायची. आपल्या समाजात मुली जन्माआधीही सुरक्षित नाहीत, आणि जन्मल्यानंतर तर नाहीतच, हेच खरंय.