पुणे : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या सतीश शेट्टी हत्याप्रकरणातील आरोपींवर सीबीआयने मेहेरबानी दाखवली का, असा सवाल उपस्थित होत आहे. 18 पैकी 12 आरोपींना पुणे कोर्टाने 50 हजारांचा जामीन मंजूर केला.


आजच्या सुनावणीदरम्यान आयआरबीच्या विरेंद्र म्हैसकरांसह 12 आरोपी हजर असताना, त्यांच्या अटकेची गरज नसल्याचं सीबीआयने पुणे न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने 12 आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

धक्कादायक बाब म्हणजे सीबीआयने याच आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये 73 एकर जमीन हडपल्याचा आरोप आहे. आणि जमीन हडपण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रं बनवल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला आरोपींच्या कस्टडीची गरज नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.

13 जानेवारी 2010 रोजी पुण्याजवळ तळेगाव-दाभाडेत आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या झाली होती. सतीश शेट्टींचा भाऊ संदीप शेट्टीने विरेंद्र म्हैसकर यांच्यावर हत्येचा आरोप केला होता.