Jyoti Mete: राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आज पुण्यात आज शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा पार पडली. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या अध्यक्षेतेखाली सभा पार पडली. राज्यातील सर्व सभासद उपस्थितीत होते. आगामी काळातील राजकीय भूमिका काय असणार यावर चर्चा झाली. यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. शिवाजी महाराज स्मारक आणि मराठा आरक्षण यावर चर्चा झाली, याबाबत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली आहे.


यावेळी निवडणुकीत शिवसंग्राम किमान ५ विधानसभा जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी आमची चर्चा सुरू आहे. मुंबई कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पाच विभागात पाच जागा पाहिजेत असंही यावेळी ज्योती मेटे (Jyoti Mete)  यांनी म्हटलं आहे.


ज्योती मेटे स्वतः निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.तर बीडमधून त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. आम्ही निवडणुका ज्या ठिकाणी जिंकेल असं वाटतं त्याच ठिकाणी लढवणार असल्याची माहिती त्यांंनी यावेळी दिली आहे. आज मनोज जरांगे पाटील याची राजकीय भूमिका ठरली नाही अजून त्यामुळे त्यांच्याशी बोलणी झाली नाही, आम्ही बोलणी सगळ्यांशी बोलणार आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


आरक्षण मुद्द्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठकीला बोलावलं तर जाऊ


आरक्षण मुद्द्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठकीला बोलावलं तर जाऊ, पण आम्हाला बोलावलंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण मेटे साहेब आरक्षणासाठी अनेक वर्षे लढत होते. त्यामुळे आम्हाला बोलावलं पाहिजे, असंही ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. जाती आणि समाजाचा निर्णय नाही तर मानसिकतेचा मुद्दा आहे, मन दुभंगले नाही पाहिजे याची काळजी सरकारने घेतला पाहिजे.विनायक मेटे यांची पण ओबीसीमधून आरक्षण मिळावी अशी मागणी होती, आज ही ओबीसीमधून आरक्षण मागणी आहे. समाजाचे हित लक्षात घेऊन मराठा आरक्षण मागणी जरांगे पाटील करत आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्योती मेटे यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस यासारख्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी कोणालाच जाहीर पाठिंबा दिला नव्हता, यावेळी त्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.