पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी मिलिंद एकबोटेंच्या शिवाजीनगरमधील घराबाहेर पुणे ग्रामीण पोलिसांनी चोवीस तास पाळत ठेवली आहे.


शनिवारी एकबोटेंच्या घराबाहेर दयानंद निम्हण नावाच्या पोलिस हवालदाराला त्यासाठी तैनात करण्यात आलं होतं. सकाळपासून निम्हण एकबोटेंच्या घराबाहेर लक्ष ठेऊन होते.

दुपारी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागाचं एक पथक पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली एकबोटेंच्या घरी त्यांचा शोध घेण्यासाठी पोहचलं. मात्र तेव्हा त्यांना त्याठिकाणी दयानंद निम्हण आढळून आले नाहीत.

थोड्या वेळाने निम्हण परत आले आणि आपण उपवास असल्याने केळी खायला चौकात गेलो होतो असं उत्तर त्यांनी गावडे यांना दिलं. त्यामुळे चिडलेल्या गावडेंनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसमोर निम्हण यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यामुळे वैतागलेले निम्हण तडक पोलीस अधीक्षक कार्यलयात पोहचले आणि त्यांनी तिथे त्यांनी एक अर्ज लिहून दिला आणि ते कोणाला काहीही न सांगता फोन स्वीच ऑफ करून निघून गेले.

पोलीस निरीक्षक गावडेंकडून आपला अपमान झाल्याने आपण निघून जात असून आपल्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्याला पोलिस निरीक्षक गावडे जबाबदार असतील, असं हवालदार निम्हण यांनी अर्जामध्ये नमूद केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

अखेर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि निम्हण यांचा पत्ता लागला. या अजब प्रकारानंतर पुन्हा एकदा एक कॉन्स्टेबल एकबोटेंच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे.