Velhe Taluka Name Change : पुणे (Pune) जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात (Velhe Taluka) राजगड (Rajgad), तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची हि मागणी होती. 


वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती.  पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. 


अजित पवारांचा सतत पाठपुरावा...


राज्याचे विरोधी पक्षनेते असताना 27 एप्रिल 2023 ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे, जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.


पुणे महापालिकेत नव्याने सामाविष्ट 34 गावांचा मिळकतकर कमी करा 


पुणे महापालिकेत नव्याने सामाविष्ठ 34 गावातील निवासी-बिगरनिवासी मिळकतींना तीनपट ते दहापट वाढीव कर आकारण्यात आल्याने संबंधित गावांवर अन्याय होत आहे. तो दूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अन्याय तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.  उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव के. गोविंदराज, आमदार सर्वश्री चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर यांच्यासह 34 गावांचे प्रतिनिधी,  नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलले...


आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर शहराचे नामकरण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Cabinet Meeting: लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा निर्णयांचा धडाका, 48 तासात 45 मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं, मुंबईतील 8 रेल्वेस्थानकांचंही नामांतर!